गणेश जगदाळे। नगर सहयाद्री
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वडगाव सावताळ येथील गाजदीपूर या आदिवासी वस्तीला जोडणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली असून, खड्डे आणि चिखलामुळे ग्रामस्थांना ये-जा करणे कठीण बनले आहे. वन विभागाच्या हद्दीतून जाणारा हा रस्ता स्वातंत्र्यापासून आजतागायत दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. स्थानिक आमदार आणि खासदार यांच्याकडून केवळ निवडणुकांमध्ये आश्वासनांचा पाऊस पडत असल्याने आदिवासी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
गाजदीपूर हे प्रामुख्याने आदिवासी समाजाचे गाव असून, येथील रहिवासी शेती आणि मजुरीवर अवलंबून आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांना बाजारपेठ, शाळा, रुग्णालय आणि इतर मूलभूत सुविधांपर्यंत पोहोचणे दुरापास्त झाले आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहने घसरण्याच्या घटना वारंवार घडतात. यामुळे गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. स्थानिक रहिवासी उत्तम नऱ्हे यांनी सांगितले, रस्त्यामुळे आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी तासन्तास चालावे लागते. निवडणुकीच्या वेळी नेते आश्वासने देतात, पण प्रत्यक्षात काहीच होत नसल्याची माहिती त्यांनी दिली.
वन विभागाच्या हद्दीत रस्ता असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी विशेष परवानगी आवश्यक आहे. मात्र, याबाबत वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. गाजदीपूरच्या रस्त्याचा प्रश्न स्वातंत्र्य पासूनच प्रलंबित आहे. स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने करून आपला रोष व्यक्त केला आहे. आमदार-खासदार फक्त मतांसाठी येतात, पण आमच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही. ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यापुढील काळात रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू असा गर्भित इशाराच आता ग्रामस्थ देऊ लागले आहेत.
खासदार व आमदारांचे फक्त निवडणुकीत आश्वासन
गाजदीपूर कडे वनविभागाच्या हद्दीतून जात असलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन पारनेर तालुक्यातीलच असलेले नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके व पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी निवडणुकीत आश्वासन दिले परंतु निवडणुकीनंतर ते गाजदीपूरकडे फिरकलेच नाही व रस्त्याचा प्रश्न जैसे थे आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
अन्यथा ग्रामपंचायतीला उमेदवारी करणार नाही
आदिवासी भागातील गाजदीपूरचा रस्ता हा वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने हा प्रश्न स्वातंत्र्यापासून प्रलंबित आहे. परंतु येत्या दोन महिन्यात गाजदीपूरकरांना शासन स्तरावरून तांत्रिक बाबींची पूर्तता करून पक्का रस्ता तयार करून देणार आहे. अन्यथा येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला उमेदवारी करणार नाही.
-संजय रोकडे ( सरपंच, वडगाव सावताळ)