इच्छुकांची चाचपणी सुरू, आघाडी बाबत योग्य वेळी निर्णय घेऊ
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर मनपा निवडणुकी करिता प्रारूप प्रभाग रचना तयार झाली असून १५ सप्टेंबर पर्यंत हरकती, सूचनांची मुदत देण्यात आली आहे. शहर शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आली असून प्रारूप प्रभाग रचनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी शहर शिवसेनेची टीम काम आवश्यक त्या ठिकाणी हरकती घेणार असून सूचना मांडणार आहे. मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवणार असून त्याकरिता सर्व प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचे शहर प्रमुख किरण काळे यांनी म्हटले आहे. आघाडी बाबत अद्याप पर्यंत कोणतीही चर्चा नसून वरिष्ठांशी चर्चा करून योग्य वेळी याबाबत निर्णय करणार असल्याचे काळे म्हणाले.
मनपा निवडणुकीचा एक प्रकारे बिगुल आता वाजला आहे. त्या पार्श्वभूमीवर काळे म्हणाले, २०१८ च्या मनपा निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र स्वबळावर लढली होती. त्यावेळी २४ नगरसेवक निवडून आले. पूर्वीच्या प्रभाग क्रमांक १० मधील ४ नगरसेवक हे देखील शिवसेनेमुळेच निवडून आले. अशा एकूण २८ जागेवर नगरकरांनी शिवसेनेला कौल दिला होता. अनेक जागा शिवसेना किरकोळ मतांच्या फरकाने हारली. तर उर्वरित जागांवर शिवसेना मुख्य लढतीत राहून क्रमांक दोनची मतं शिवसेनेने घेतली होती.
शहरात शिवसेनेला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. ठाकरे शिवसेना कंबर कसून तयारीला लागली आहे. आमच्या विभागावर बैठका यापूर्वीच झालेल्या आहेत. योग्य टप्प्यावर निवडणुकीची रणनीती निश्चित करून आम्ही ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे काळे म्हणाले.
अनेक इच्छुक संपर्कात :
काळे यांनी दावा केला आहे की, शिवसेनेच्या उमेदवारीसाठी शहरातील अनेक आजी – माजी नगरसेवक इच्छुक असून ते संपर्कात आहेत. अनेक नवीन चेहरे देखील मागणी करत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेला वेग येईल. सक्षम उमेदवार देत ताकदीने ही निवडणूक शिवसेना जिंकणार असल्याचे काळे म्हणाले.
अजून शहर विकास आघाडी नाही :
काळे म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. शहर आणि दक्षिणेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये जागा राष्ट्रवादीला आम्हाला सोडाव्या लागल्या. मनपा निवडणूक कशी लढवायची याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही. मविआ ऐवजी शहर विकास आघाडीच्या सुरू असणाऱ्या चर्चां बाबत काळे यांना विचारले असता ते म्हणाले, अशी कोणतीही चर्चा शहर शिवसेनेने कोणाशी केलेली नाही. आघाडीच्या राजकारणात शहर शिवसेनेचे अस्तित्व आणि भागीदारी कोणत्या ही परिस्थितीत कमी होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. आघाडी करायची की स्वबळावर लढायचं याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.