सुपे MIDC मधील GMCC कंपनीत 150 युवकांवर अन्याय../ पारनेर भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मनोज मुंगसे आक्रमक
पारनेर / नगर सह्याद्री-
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपे MIDC मधील GMCC कंपनीत 150 युवकांवर गंभीर अन्याय झाला आहे. कंपनीने या युवकांना कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देऊन तीन वर्षे कमी पगारावर ऑन रोल ट्रेनी म्हणून काम करून घेतले. या काळात वारंवार लवकरच पर्मनंट करू असे सांगितले गेले. मात्र, तीन वर्षांच्या सेवेनंतर कंपनीने या युवकांना कॉन्ट्रॅक्टवर काम करण्याचा पर्याय दिला, नाहीतर कंपनी सोडण्याचा अल्टिमेटम दिला. यामुळे युवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या प्रकरणी भाजप तालुका युवा मोर्चा अध्यक्ष मनोज मुंगसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकारावर मनोज मुंगसे यांनी कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी आरोप केला की, GMCC कंपनीतील सर्व कॉन्ट्रॅक्ट्स (बस, लेबर, स्क्रॅप) हे जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याशी संबंधित आहे. इतकेच नव्हे, तर कंपनीचा मॅनेजर हा त्या मोठ्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याचा गंभीर दावा मुंगसे यांनी केला. कंपनीने युवकांची स्वप्ने आणि विश्वासघात केला आहे. हे अन्यायकारक आहे आणि आम्ही याविरोधात आवाज उठवू,असे मुंगसे यांनी सांगितले.स्थानिक युवकांनीही कंपनीच्या या धोरणाला कडाडून विरोध दर्शवला आहे. आम्ही तीन वर्षे मेहनत केली, पण आता आम्हाला कॉन्ट्रॅक्टवर ढकलले जात आहे. ही फसवणूक आहे, असे एका कंपनीत काम करणाऱ्या युवकाने सांगितले.
या प्रकरणामुळे सुपे MIDC मधील औद्योगिक वातावरण तणावपूर्ण बनले आहे. भाजप युवा मोर्चाने या प्रश्नी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याची मागणी केली असून, आवश्यकता भासल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. कंपनीकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. हा वाद पुढे काय वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बेरोजगार युवकांना कंपनी रोलवर कामाला घ्या…
मनोज मुंगसे यांनी आक्रमक पवित्रा घेत सुपा एमआयडीसीतील कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करून बेरोजगार युवकांना तसेच भूमिपुत्रांना कंपन्यांमध्ये कंपनी रोलवर काम मिळावे ही प्रामुख्याने मागणी आहे असे न झाल्यास येणाऱ्या काळात आंदोलनात्मक भूमिका घेऊ असे भाजप युवा मोर्चाचे पारनेर तालुका अध्यक्ष मनोज मुंगसे यांनी सांगितले.
GMCC कंपनीच्या आडमुठ्या धोरणाला जबाबदार कोण ?
सुपा एमआयडीसीतील GMCC या कंपनीने युवकांवर केलेला अन्याय हा विश्वासघातकी स्वरूपाचा आहे. कंपनीच्या प्रशासनाने घेतले ला निर्णयाला व आडमुठ्या भूमिकेला खरे कोण जबाबदार आहे ? कंपनीवर काय कारवाई होणार !