अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, जुना दाणे डबरा, वंजार गल्ली, तपकीर गल्ली, गंजबाजार या भागात माल देण्यासाठी व घेण्यासाठी आलेल्या टेम्पो व इतर वाहनांवर पोलिसांकडून वारंवार ऑनलाईन दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांचे अतोनात नुकसान होत असून ते बाजारपेठेत येण्यास नकार देऊ लागले आहेत. त्यामुळे पोलिसांना ऑनलाईन दंड करण्याची कारवाई त्वरित थांबवण्यासाठी योग्य तो आदेश द्यावेत. बाजारपेठेतील वाहनांना थेट दंड न आकारता पोलिसांनी वाहतूक सुरळीत कशी करता येईल याकडे लक्ष देऊन वाहन चालकाला व व्यापाऱ्यांना सहकार्य करावे. तसेच मंगलगेट पोलीस चौकी त्वरित सुरू करून चोऱ्यांना आळा घालावा, आदी मागण्यांचे निवेदन आडते बाजार व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना देण्यात आले.
यावेळी आमदार संग्राम जगताप, आडते बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थेचे उपध्यक्ष गोपाल मणियार, सचिव संतोष बोरा, मार्केट कमिटी संचालक राजेंद्र बोथरा, राजेश गुगळे, सचिव विश्वनाथ कासट, अशोक भंडारी, सल्लागार रमेश सोनीमंडलेचा, मिलिंद जांगडा, संजय लोढा, माजी नगरसेवक विपुल शेटिया व अन्य व्यापारी उपस्थित होते.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,अहिल्यानगर मधील बाजारपेठ राज्यातील मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. या बाजारपेठांमध्ये नगरसह आजूबाजूच्या अन्य जिल्ह्यांतील दुकानदार व व्यापारी माल खरेदी विक्रीसाठी येत असतात.
त्यामुळे साहजिकच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात माल वाहतुकीसाठी तीन-चार चाकी छोटे, मोठे टेम्पो येत असतात. त्यामुळे बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होते.या बाजारपेठेत ठरावविक वेळेतच पोलीस अधूनमधून उभ्या असलेल्या मालवाहतुकदारांच्या वाहनाचा फोटो काढून ऑनलाईन दंड करत आहेत. हे प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून चालू आहेत. त्यामुळे मालवाहतूक टेम्पो, वाहनचालक कोणताही माल घेण्यासाठी व देण्यासाठी बाजारपेठेत येण्यास तयार नाही. याचा बाजारपेठेवर खूप मोठा व्यवसायिक परिणाम होऊन बाजारपेठ बंद पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर खूप मोठा अन्याय होत आहे. बाजारपेठेतील वाहन चालकाला विनाकारण दंड भरावा लागत असल्याने त्याचा व्यवसाय बंद पडत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
गस्त वाढवावी, मंगलगेट पोलीस चौकी सुरू करा
पोलिसांनी ऑनलाईन दंड करण्याची कारवाई त्वरित थांबविण्यासाठी योग्य तो आदेश द्यावेत. बाजारपेठेत पोलिसांनी थेट दंड न आकारता वाहतुक सुरळीत कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे. बाजारपेठेत मंगलगेट पोलीस चौकी आहे. अनेक वर्षांपासून ती बंद असते. तेेथे पोलीस दिसत नाही. ही चौकी त्वरित चालू करून तेथे पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच बाजारपेठांमध्ये पोलिसाची गस्त वाढवावी जेणेकरून बाजारपेठेतील चोऱ्यांना आळा बसेल, असेही निवेदनात म्हटले आहे.