अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
कौटुंबिक वादातून मुलाने आईवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना जखणगाव (ता. अहिल्यानगर) येथे 28 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. जनाबाई बाबासाहेब भिसे (वय 56, रा. जखणगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाविरूध्द 1 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुर्यकांत बाबासाहेब भिसे (रा. जखणगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. फिर्यादी जनाबाई भिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आपल्या घरासमोरील गोठ्यात दुध काढत असताना सुर्यकांत हा तेथे आला. त्याने फिर्यादीला विचारले, माझी बायको व मुले कुठे आहेत? त्यावर फिर्यादी त्याला म्हणाल्या तु पुण्याला बोलावले आहे.
त्यानंतर सुर्यकांतला त्याचा राग येऊन त्याने शिवीगाळ केली व फिर्यादीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने प्रतिकार करत त्याला ढकलून दिल्यावर सुर्यकांतने जवळ असलेल्या ऊसतोडणीच्या कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर जखम होऊन फॅक्चर झाले. त्यानंतर सुर्यकांतने त्यांच्या डोक्यावरही वार केला, ज्यामुळे त्या जागीच बेशुध्द झाल्या. तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत तो तेथून निघून गेला. जखमी फिर्यादीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार जंबे करीत आहेत.