पुणे | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती 2025 या स्पर्धेमध्ये पै. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली, त्याला पंचांना लाथ मारायचा अधिकार नाही. एखाद्याची चूक झाली असेल तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. आता यावर कुस्तीगीर परिषदेच्या न्यायालयाने निर्णय घेतला आहे आणि पंचांवर बंदी घातली आहे. शिवराज राक्षेने आम्हाला पत्र दिलं तर आमची कार्यकारिणी बसून चर्चा करेल. त्यानंतर आमच्यात बहुमाताने निर्णय झाला तर त्याच्यावरील बंदी आम्ही मागे घेऊ असे मत कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेतील पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे (उपांत्य सामना) यांच्यातील कुस्तीचा निकाल वादग्रस्त ठरला होता. याप्रकरणी मल्ल शिवराज राक्षेचं कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षांसाठी निलंबन केलं आहे. मात्र, शिवराज राक्षेचा पंचांच्या निर्णयावरील आक्षेप योग्य होता हे स्पष्ट झालं आहे. दोघांमधील कुस्तीच्या निकालाप्रकरणी कुस्तीगीर परिषदेने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने पंच नितेश काबिले यांच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे.
दरम्यान, पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरलेल्या शिवराजच्या भविष्याबाबत कुस्तीगीर परिषदेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याच्यावरील बंदी देखील उठवलेली नाही. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांना विचारलं की शिवराज राक्षे पंचांमुळे चितपट झाला, पंच चुकल्यामुळे राक्षेवर अन्याय झाला असं तुम्हाला वाटत नाही का? यावर भोंडवे म्हणाले, याअगोदरही पंचांच्या चुका झाल्या आहेत. कुस्तीच नव्हे तर सर्वच खेळात पंच चुकतात. क्रिकेटमध्येही पंचांच्या चुका होतात. तिथे आपल्याकडे तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा पर्याय असतो. आपण तिसऱ्या पंचांकडे गेलो नाही तर निकाल बदलत नाही.
महेंद्र गायकवाडवरील निलंबनाची कारवाई रद्द
शिवराज राक्षेचे प्रशिक्षक काकासाहेब पवार यांनीच मागणी केली होती की पंचांवर कारवाई व्हावी, त्यानुसार चौकशी समितीच्या अहवालानंतर पंचांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या अहवालानंतर आम्ही पैलवान महेंद्र गायकवाडवरील निलंबनाची कारवाई रद्द केली आहे. त्याने आम्हाला पत्र पाठवलं होतं की मैदानात जे काही घडलं ते त्याच्याकडून गैरसमजुतीने घडलं होतं. त्याबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही त्याचं पत्र स्वीकारून त्याच्यावरील कारवाई रद्द केली आणि निलंबन मागे घेतले. शिवराज राक्षे पत्र पाठवेल तेव्हा त्यावर आम्ही विचार करू. कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बसून चर्चा करेल आणि निर्णय घेईल असे भोंडवे म्हणाले.