गुन्हेगारी क्षेत्रात वाढ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यात चोऱ्या, फसवणूक, पाकीटमारी आणि घरफोड्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांचे दागिने हिसकावणे, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी आणि फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत.
सोमवार दि. ४ ऑगस्ट रोजी शहरातील बाजारतळ राम मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. भिंगण खालसा गावचे रहिवासी लक्ष्मण बबन खंडागळे यांना दोन अनोळखी मांत्रिकांनी गंडवून खोटा मंत्र मारून त्यांच्याकडील ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. संशयित आरोपी पांढऱ्या कपड्यातील ३० वर्ष वयोगटातील होते. मुख्य आरोपीच्या पाठीवर कॉलेजची बॅग होती. त्यांनी धार्मिक बोलण्याच्या बहाण्याने खंडागळे यांना गाठले आणि त्यांच्या कडील ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचा दागिने हातोहात लंपास केले.
शहरातील बसस्थानक परिसरात पाकीटमार चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. गर्दीचा फायदा घेत मोबाईल आणि पाकिटे चोरी केली जात आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असतानाही चोरटे निर्भयपणे फिरत असल्यामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तालुक्यातील विविध गावांमध्येही घरफोड्या व दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
विशेषतः वयोवृद्ध किंवा बंद घरे चोरट्यांचे मुख्य लक्ष बनत आहेत. सध्या शहरात असुरक्षिततेची भावना वाढत असून व्यापारी, महिला आणि सर्वसामान्य नागरिक पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी करत आहेत. सोमवारी भरणाऱ्या बाजारात चोरट्यांचा वावर अधिक जाणवत असल्याने त्या दिवशी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
पोलीस बंदोबस्ताची गरज: नाना शिंदे
श्रीगोंदा एसटी स्टँड आणि बाजारपेठेमध्ये दर सोमवारी चोरांचे सुळसुळाट होतो. भांडणे, फसवणूक आणि चोरी टाळण्यासाठी त्या दिवशी पोलीस बंदोबस्त गरजेचा आहे .स्थानिक प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी केली आहे.