अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
ग्राहकाला आलेल्या कॉलवर नो बटन दाबताच त्याच्या खात्यातून तातडीने १ लाख ६१ हजार रुपये गायब झाल्याचा प्रकार शिर्डीत एचडीएफसी बँकेच्या ग्राहकाबाबत झाला आहे.या बँकेत ग्राहकांना लक्ष्य करून होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांनी शिर्डी, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातील ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. उच्चशिक्षित व्यक्तीही या फसवणुकीला बळी पडत असून, यात बँकेच्या कार्यप्रणालीवर आणि ग्राहक सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शिर्डीतील प्राध्यापकासोबत मोठी फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर हे प्रकरण समोर आले. एम.टेक. शिक्षण घेऊन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षक असलेले शिर्डीचे सादिक शौकत शेख हे या फसवणुकीचे ताजे शिकार ठरले आहेत. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५.४२ वाजता त्यांना एचडीएफसी बँकेतून कथित डेबिट टेली कन्फर्मेशनसाठी कॉल आला. एटीएम कार्डचा वापर करून १,६१,२५८.३८ रुपये ट्रान्सफर झाल्याचे सांगत, व्यवहार रद्द करण्यासाठी ‘नो’ बटन दाबण्यास सांगण्यात आले. शेख यांनी नो दाबले, तरीही त्यांच्या खात्यातून तातडीने ही रक्कम वजा झाली.
महत्त्वाचे म्हणजे शेख यांचे कार्ड घरात होते, मोबाइल इंटरनेट बंद होते, त्यांनी कोणताही ओटीपी दिलेला नव्हता आणि कुठलीही अनावश्यक लिंक उघडली नव्हती. तरीही पैसे वजा झाल्याने हे प्रकरण कार्ड स्किमिंग किंवा फिशिंगपेक्षा गंभीर असल्याचा संशय आहे. घटनेनंतर शेख यांनी तातडीने कस्टमर केअर आणि सायबर सेलकडे तक्रार केली. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत केस निकाली काढण्याचे आश्वासन दिले. या दिरंगाईवर शेख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ग्राहकाने तीन दिवसांत तक्रार दाखल केल्यास १० दिवसांच्या आत बँकेला पैसे परत करणे बंधनकारक आहे. बँक २६ दिवसांचा अवधी मागत असल्याने एचडीएफसी बँकेला आरबीआयचे नियंत्रण आहे की नाही? असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला आहे.