जामखेड । नगर सहयाद्री:-
क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील मुख्य वीज वाहिनीचा शॉक लागून १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जामखेड शहरातील खर्डाचौका जवळील टेकाळे नगर या ठिकाणी घडली. विजेच्या तारांना चिकटून मृत्यू होण्याची आठ दिवसांतील तिसरी घटना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जामखेड शहरातील खर्डा चौकातील टेकाळे नगर या ठिकाणी सोमवारी (दि.३०) सायंकाळी साडेपाच वाजता प्रणव प्रशांत टेकाळे, (वय १२ वर्षे) हा आपल्या मित्रांनसोबत घराजवळ क्रीकेट खेळत होता. घराजवळुनच मुख्य विद्युत वाहीनीची लाईन गेली आहे. क्रिकेट खेळत असताना बॉल स्लॅपवरती गेला. या जवळच मुख्य विजेच्या तारा होत्या. प्रणव याने फ्लेस चा लोखंडी पाईप सदरचा बॉल काढण्यासाठी घेतला व बॉल काढत असताना त्याच्या हातातील पाईपचा या लाईटच्या तारांना धक्का लागला व त्याचा मृत्यू झाला.
यावेळी त्याठिकाणी असलेल्या नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मागील आठ दिवसापूर्वीच जामखेड तालुयातील बाळगव्हाण येथील उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप- लेकाचा शेतातील खाली पडलेल्या विजेच्या तारांना चिकटून मृत्यू झाला होता. विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे ग्रामस्थांनमधून बोलले जात होते. यानंतर खर्डा-बाळगव्हाण येथील महीला वायरमन यांना दोषी ठरवुन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची जामखेड तालुयातील येत्या आठ दिवसातील ही तिसरी घटना आहे.
महावितरण अनभिज्ञ
शहरातील सदाफुले वस्ती येथील टेकाळे नगर येथे विजेचा तारेला स्पर्श होऊन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना संपूर्ण शहरात पसरली, पण महावितरणच्या अधिकार्यांना काहीही माहिती नव्हते. घटनेनंतर कोणीही महावितरणचे अधिकारी घटनास्थळी आले नव्हते.