छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री –
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेला महाराष्ट्रात मोठा आर्थिक अडथळा निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील 35 वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येने या योजनेच्या गंभीर समस्यांना अधोरेखित केले आहे.
हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण केली होती, परंतु शासनाकडून 1.40 कोटी रुपयांचे थकित बिल आणि 65 लाखांचे कर्ज यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर जलजीवन मिशनच्या 35,622 कोटी रुपयांच्या थकबाकीचा मुद्दा समोर आला आहे, ज्यामुळे कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत आणि सरकारवर जोरदार टीका होत आहे.
जलजीवन मिशनच्या कामांसाठी 35,622 कोटी रुपये थकले आहेत. केंद्र सरकारकडून 19,259 कोटी रुपये, तर राज्य सरकारकडून 16,363 कोटी रुपये ठाकले आहेत. 2024-25 मध्ये केंद्राने जलजीवन मिशनसाठी 5,352.93 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले होते, परंतु केवळ 1,605.879 कोटी रुपये मिळाले.
ऑक्टोबर 2024 पासून केंद्राकडून एकही रुपया प्राप्त झालेला नाही. तसेच राज्याने 2024-25 साठी 4,052.50 कोटी रुपये मंजूर केले, त्यापैकी 1,568.4086 कोटी रुपये वितरित झाले. परंतु, लाडकी बहीण योजनेसारख्या इतर योजनांमुळे जलजीवन मिशनसाठी निधी वर्ग करण्यात अडथळे येत आहेत.
हर्षल पाटील आत्महत्या प्रकरण काय?
सांगलीतील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत गावांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण केली होती. मात्र, 1.40 कोटी रुपयांचे थकित बिल आणि त्यासाठी घेतलेल्या 65 लाखांच्या कर्जामुळे त्यांच्यावर प्रचंड आर्थिक आणि मानसिक दबाव होता. सरकारकडून वेळेत पैसे न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे. या घटनेने कंत्राटदारांमधील असंतोष आणि योजनेच्या अंमलबजावणीतील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत.
कोण आहेत हर्षल पाटील?
हर्षल पाटील हा तरुण शासकीय कंत्राटदार होता. तांदुळवाडी गावातील नागरीक आणि नातेवाईकांनी त्याच्याविषयी माहिती दिली. त्याने अगोदर कोल्हापूर जिल्ह्यात विविध शासकीय कामे केली. कोल्हापूरात चांगली कामे केल्याच्या जोरावर त्याला सांगली जिल्ह्यातही सरकारी कामे मिळाली. गावातीलच जल जीवन मिशनचे काम त्याने हाती घेतले. त्याच्या कामामुळे इतर गावातील नागरिकांनी, ग्रामपंचायतींनी त्याच्यामार्फत कामे करण्याचा प्रशासनाकडे हट्ट केल्याची आठवण नागरीकांनी सांगितली. कोल्हापूर शहरातील कामं केल्यानंतर त्याने तांदळी येथील जल जीवनचे काम एका वर्षातच पूर्ण केले होते. इतर ठिकाणची कामं त्याला मिळाली. शासनाकडून थकीत बिल निघत नसतानाही त्याने उसनवारी करून काही ठिकाणची कामं मार्गी लावली. आपल्या नावाला बट्टा लागणार नाही, असे काम त्याने केले. पण साहित्य खरेदीसाठी त्याचा खर्च वाढला. आता बिलासाठी त्याच्यामागे तगादा लागला. थकीत बिलासाठी तो शासकीय कार्यालयात फेऱ्या मारत होता. थकीत बिल लवकर मिळावे यासाठी तो अधिकाऱ्यांना भेटला. पण त्याला यश मिळाले नाही. तो यामुळे तणावात आला आणि एक होतकरू तरुण गमवावा लागला अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली. वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी राज्य सरकारच्या जलजीवन योजनेतून कामे केली. तांदुळवाडी या गावात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावातील अनेक घरात दारात पिण्याचे पाण्याचा नळ जोडून लोकांना घरात पाणी देण्याची सोय केली. मात्र राज्य सरकारकडून दिले वेळेत न मिळाल्यामुळे आपल्या जीवनाचा शेवट केला. एक होतकरू, मनमिळावू तरूण हिरावल्याने त्याच्या मित्रांना शोक अनावर झाला.