Maharashtra murder news: आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला अन् मित्रानेच मित्राचा काटा काढला. मित्राचा खून करून मृतदेह शेतात पुरला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावात ही धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे. मित्राच्या चारित्र्यावर संशय घेऊन विकास मारुती गुरव याने आपला मित्र नेताजी तानाजी नामदे याचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याची खळबळजनक घटना समोर आली. ही घटना २४ ते २८ मे २०२५ दरम्यान घडली. मोहोळ पोलिसांनी आरोपी विकास गुरव याला अटक केली आहे.
नेताजी नामदे हा दळण आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र, तो परत न आल्याने त्याचे वडील तानाजी नामदेव यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, नेताजीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप माहितीच्या आधारे तपासाला गती मिळाली. वडिलांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार, पोलिसांनी विकास गुरव याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, विकासने नेताजीने त्याच्या आईसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या संशयातून खून केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासने नेताजीचा खून करून त्याचा मृतदेह शेतात पुरला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात विकास गुरव याला २ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना सौंदणे गावात आणि मोहोळ तालुक्यात चर्चेचा विषय बनली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणातील इतर बारीकसारीक तपशील उघड होण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी या क्रूर कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.