उर्दू भाषेतूनही लिहिता येणार निबंध, ५००० विद्यार्थी होणार सहभागी ; या माध्यमातून महाराजांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार : किरण काळे
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
शिवजयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य छत्रपती शिवराय निबंध स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. पाच हजारहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे विचार उद्याचं राष्ट्राच भवितव्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. छ. शिवरायांच्या दैदीप्यमान कर्तुत्वाचा जाज्वल्य इतिहास घराघरात पोहोचावा ही या मागची आमची भूमिका आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन शहरप्रमुख किरण काळे यांनी केले आहे. शिवजयंती दिनी या स्पर्धेची घोषणा शहर शिवसेना ठाकरे पक्षाने केली आहे.
अहिल्यानगर शहर शिवसेना व शिक्षक सेनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन किरण काळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असल्याची माहिती शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख तथा स्पर्धा समन्वयक अंबादास शिंदे सर यांनी दिली आहे. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वयोगटासाठी स्पर्धा असणार आहे. निबंधासाठी पाचशे शब्दांची मर्यादा आहे. प्रवेश सर्वांसाठी खुला व विनामूल्य असून २८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत आहे.
स्पर्धकांनी आपला निबंध स्कॅन करून पीडीएफ फॉरमॅटमध्ये 9325182595, 9922914264 या व्हाट्सअप क्रमांकांवर पाठवायचा आहे. तसेच [email protected] या ईमेल आयडीवर देखील निबंध पाठविता येतील.
निबंध पाठविताना वरील बाजूस स्पर्धकाचे संपूर्ण नाव, इयत्ता, तुकडी, शाळेचे नाव, पालकांचे नाव व मोबाईल क्रमांक, संपूर्ण पत्ता नमूद करण्याचे आवाहन शहर शिवसेनेने केले आहे.
स्पर्धेसाठी निबंधाचे पुढील दहा विषय देण्यात आले आहेत : १. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, २. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन, ३. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, ४. छत्रपती शिवाजी महाराजां कडून मराठा साम्राज्याची स्थापना, ५. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श, ६. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य, ७. छत्रपती शिवराय एक आदर्श राजा, ८. मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय, ९. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर, १०. छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र.
प्रत्येक इयत्तेसाठी प्रथम पाच व पाच उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. याप्रमाणे प्रत्येक इयत्तेसाठी दहा अशी एकूण पन्नास बक्षीसे दिली जाणार आहेत. शालेय साहित्य, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप आहे. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभागा बद्दलचे प्रमाणपत्र देखील दिले जाणार असल्याचे शहर शिवसेनेने म्हटले आहे.
उर्दू भाषेतून लिहिता येणार निबंध –
स्पर्धकांना चार विविध भाषांमधून निबंध लिहिता येणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजीसह उर्दू भाषेतून देखील स्पर्धक निबंध लिहू शकतील. शिवसेना ठाकरे पक्षाच्या पुढाकारामुळे अहिल्यानगर शहरात पहिल्यांदाच या निमित्ताने छत्रपती शिवरायांवर उर्दू भाषेतून निबंध लेखन स्पर्धा पार पडत आहे.
गँगस्टर्सचे उदात्तीकरण किळसवाणे:
१८६९ मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंती उत्सव सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं, शिवाजी महाराजांच स्मरण व्हाव, असा हेतू यामागे होता. पण मागील शिवजयंती मिरवणुकीमध्ये जगभर कुविख्यात असणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई सारख्या गँगस्टरचे पोस्टर अहिल्यानगर शहरात झळकले. त्यामुळे शहराची भारतभर बदनामी झाली. गुन्हेगारीच उदात्तीकरण झालं. तरुण पिढीसमोर चुकीचे आदर्श ठेवले जात आहेत. हे समाजासाठी घातक आहे. स्व. अनिलभैय्या राठोड हयात असताना तसं घडत नव्हतं. मिरवणुकांमध्ये कुणी दारू पिऊन आलं, चुकीचं कृत्य केलं तर ते अशा व्यक्तीला लगेच बाजूला करायचे. पण त्यांच्या पश्चात आता तसं राहिल नाही. म्हणूनच शहर शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार भावी पिढीच्या मनात रुजले जावेत यासाठी निबंध स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना जाज्वल्य इतिहासाचा अभ्यास करण्या करिता प्रवृत्त करत व्यक्त होण्या करिता व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे शहरप्रमुख किरण काळे यांनी म्हटले आहे.
दरवर्षी १९ फेब्रुवारीला सकाळी शहरातून पारंपारिक मिरवणूक निघते. यामध्ये जिवंत देखावे सादर केले जातात. पारंपरिक वेशभूषा, मर्दानी खेळ सादर केले जातात. आपल्या माता, भगिनींना देखील यामध्ये नि:संकोचपणे सहभागी होता येते. या मिरवणुकीचे चितळे रोडवर स्व.अनिलभैय्या राठोड यांनी स्वागत करण्याची सुरू केलेली परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आजही शहर शिवसेनेच्या वतीने सुरू आहे. ती अशीच अखंडपणे सुरू राहील, असे शहर शिवसेनेने म्हटले आहे.