अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आयटी इंजिनिअरची तब्बल 1 कोटी 10 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करणार्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चौघांना अटक करण्यात आली आहे.महावीर दिगंबर कांबळे (वय 42, रा. गोटेवाडी, मोहोळ, सोलापूर), प्रवीण दत्तू लोंढे (वय 38, रा. वडवळ स्टॉप, मोहोळ, सोलापूर), शिवाजी साहेबराव साळुंके (वय 40, रा. वडवळ, मोहोळ, सोलापूर), सागर उर्फ केशव शंतजय कुलकर्णी (रा. वाणी गल्ली, गणेश मंदिर जवळ, मोहोळ, सोलापूर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय घडलं?
‘एसएमसी’ ग्लोबल सिक्युरिटीज ही ‘सेबी’ कडे नोंदणीकृत कंपनी असल्याचे सांगत शेंडी (ता. नगर) येथील रहिवाशी आयटी इंजिनिअरला 20 ते 30 टक्के नफ्याचे आमिष दाखवत मोबाईल अॅपवरून शेअर ट्रेडिंग करण्यास भाग पाडले. या माध्यमातून 1 कोटी 10 लाख 80 हजार रुपये जमा झाल्यावर त्यांना अॅपवर व व्हॉट्सअॅपवर ब्लॉक करून त्याची फसवणूक केली. 12 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ही घटना घडली. आयटी इंजिनिअरने 27 जानेवारी 2025 रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सायबर पोलिसांची कामगिरी
पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाव्दारे संशयित आरोपींचा शोध घेतला. गुन्ह्याचा तपास करताना, फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित बँक खात्यांवर लक्ष केंद्रित करून, पोलिसांनी मोहोळ, (जि. सोलापूर) येथून महावीर दिगंबर कांबळे याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या इतर तीन साथीदारांची नावे सांगितली. ते तिघे गांवदेवी पोलीस ठाणे (मुंबई) येथील एका गुन्ह्यात अटकेत होते. त्यांना त्या गुन्ह्यातून वर्ग करून घेत अटक केली आहे. सदरची कामगिरी उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, अभिजीत अरकल, राहुल हुसळे, निलकंठ कारखेले, अरुण सांगळे, मोहंमद शेख, मल्लिकाअर्जुन बनकर, दिगंबर कारखेले, महिला अंमलदार दिपाली घोडके, सविता खताळ, प्रितम गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.
फसवणुकीचे मोठेजाळे
पोलिसांनी अटक केलेल्या चौघांकडे चौकशी केली असता असे आढळून आले की, संशयित आरोपींनी परदेशातील (कंबोडिया) टोळीशी संगनमत करून बँक खाती उघडली होती. भारतीय नागरिकांकडून बँक खाते उघडून, त्या खात्यांवर आलेले पैसे परदेशात पाठवले जात होते. त्यामुळे फसवणुकीची रक्कम परत मिळवणे आणि मुख्य सूत्रधारांना अटक करणे कठीण झाले आहे.