Maharashtra Crime News: ‘आय लव्ह यू’ म्हणाल्याचा राग मनात धरून दोन तरुणांनी मिळून एका ३५ वर्षीय व्यक्तीचा बेदम मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह बेवारस अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. खून झालेल्या व्यक्तीचे नाव साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५) असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१) आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय २२) अशी आहेत.
१२ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता चंदननगर येथील आंबेडकर वसाहतीत पोलिसांना एक मृतदेह बेवारस अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवून, शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. पोस्टमार्टम अहवालात जबर मारहाणीचे स्पष्ट उल्लेख आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पोलिस तपासात उघडकीस आले की, मृत साईनाथने आरोपी आदित्य वाल्हेकर याच्या चुलतीला छेडल्यासारखे वर्तन केले होते आणि तिला ‘आय लव्ह यू’ असेही म्हटले होते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आदित्यने आपल्या मित्राच्या मदतीने साईनाथला हॉकी स्टिकने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर दुखापत झाल्याने साईनाथचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
आरोपी आदित्य वाल्हेकर यानेच पोलिस नियंत्रण कक्षाला “एक व्यक्ती पडलेला आहे” अशी माहिती देऊन संशय टाळायचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या कसोशीच्या तपासामुळे खरे चित्र समोर आले आणि त्यानेच खून केल्याची कबुली दिली. चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.