अहिल्यानगर | नगर सह्याद्री
काहींनी प्रथमच शाळा पाहिली, तर काहींनी पुन्हा पुन्हाचा अनुभव घेतला. शाळा सुरू झाल्या आणि गजबज वाढली. घणघण घंटा वाजे हा नित्यक्रम सुरू झाला. ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ या पूर्वापार चालत आलेल्या ओळीतील ‘छडी लागे छम छम’ आता जवळपास बाद झाले असले तरी ‘विद्या येई घम घम’चा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेत पहिल्याच दिवशी पहिले पाऊल टाकले आणि घण घण घंटाही वाजली.
राज्यातील शाळांमध्ये आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या गोंगाटाने पुन्हा एकदा शाळा गजबजून गेल्या. पहिल्या दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कित्येक ठिकाणी फुगे, फुलं, रांगोळ्या, वेलकम बॅनरने शाळांचे स्वागतद्वार सजवले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना टाळ्यांच्या गजरात आणि मिठाई देऊन, गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. काही शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. काही चिमुकल्यांनी शाळा काय चीज असते याचा अनुभव घेण्याचसाठी पहिल्या दिवशी शाळेत पहिले पाऊल टाकले आणि उत्सुकतेचा अनुभव घेण्यास सुरुवात केली.
पहिल्याच दिवशी शासनाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. पालकही आपल्या मुलांना शाळेत घेऊन आले होते आणि पहिल्या दिवसाच्या गोड आठवणी टिपत होते.अनेक विद्यार्थ्यांना नवीन वर्ग, नवीन शिक्षक, नवीन मित्रमंडळी यांची उत्सुकता होतीच. प्रथमच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. शिक्षकांनी शाळेची ओळख करून देत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. शाळा व्यवस्थापन समित्यांकडूनही शाळा स्वच्छता, पिण्याचे पाणी, टॉयलेट सुविधा यांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. एकंदरीत, पहिल्या दिवसाचा शाळांचे वातावरण हा आनंददायक आणि प्रेरणादायी होता. नव्या सुरुवातीसह विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षात यशाची पावले रोवण्याची तयारी सुरू केली आहे.