गाजीपुर रस्त्याच्या प्रश्नासाठी बसले आहेत उपोषणाला / महावितरण संदर्भातही विविध मागण्या
पारनेर / नगर सह्याद्री :
पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या वडगाव सावताळ ते गाजदीपुर रस्त्याच्या कामासह वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी गावाचे सरपंच संजय रोकडे यांनी शनिवार, ९ ऑगस्ट २०२५ पासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. वन विभागाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे, ज्यामुळे ग्रामस्थांना दळणवळणाच्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय, जलजीवन मिशन पाणी योजनेसाठी तातडीने वीज जोडणी आणि गाजदीपुरसह गावाला पूर्ण दाबाने वीजपुरवठा व्हावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी उपोषणाद्वारे लावून धरली आहे.
रविवारी, उपोषणाचा दुसरा दिवस असताना, सरपंच संजय रोकडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले. गावकऱ्यांनी रस्ता आणि वीजपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शनिवारी महावितरणचे उपअभियंता शरद महाडुंळे, टाकळी ढोकेश्वर शाखेचे अभियंता देशमुख पप्पू ढुस आणि पंकज वतपाळ यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, रस्त्याच्या प्रश्नावर ठोस कार्यवाही होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार सरपंच रोकडे आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
हा रस्ता पूर्ण झाल्यास वडगाव सावताळ आणि गाजदीपुर येथील ग्रामस्थांचा प्रवास सुलभ होईल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. याशिवाय, जलजीवन मिशन योजनेच्या वीज जोडणीमुळे गावाला पुरेसे पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढत, गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे.
या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, ग्रामस्थांनी एकजुटीने आपला आवाज बुलंद केला आहे. वन विभाग आणि महावितरणने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उपोषणकर्त्यांचा हा लढा यशस्वी होऊन रस्ता आणि वीजपुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागले आहे.



