मुंबई / नगर सह्याद्री –
अभिनेता सलमान खानला मागील काही दिवसांपासून सातत्याने जीवे मारण्याच्या धमकी मिळत आहे. त्याअनुषंगाने त्याच्या सुरक्षितेत देखील वाढ करण्यात आली आहे. मात्र आता पुन्हा एकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्स ॲप क्रमांकावर मिळाली आहे. याशिवाय त्याच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, सलमान खान गेल्या कित्येक वर्षांपासून बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आहे.
काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी आणि सलमान खानचे घनिष्ठ संबंध होते. सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगनं स्विकारली आहे. दरम्यान, मागील वर्षी एप्रिलमध्ये सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केला होता. याशिवाय सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र लिहिण्यात आलं होतं.
सलमान काय म्हणाला होता?
काही दिवसांपूर्वीच सलमानने सतत मिळणाऱ्या धमक्यांबाबत प्रतिक्रिया दिली होती. “देव, अल्लाह सर्वकाही त्याच्यावर आहे. जेवढं वय जगायचं लिहिलंय, तेवढं जगणार. पण कधी कधी इतक्या लोकांना सोबत घेऊन राहावं लागतं, फक्त हीच एक समस्या आहे,” असे त्याने सांगितले होते. दरम्यान, सलमानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट नुकताच ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. यात रश्मिका मंदान्ना देखील मुख्यभूमिकेत आहे.