अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर शहरातील प्रमुख बाजारपेठेला अतिक्रमण धारकांनी विळखा घातला आहे. या अतिक्रमणांमुळे बाजारपेठेचे वैभव लोप पावत आहे. बाजारपेठ तातडीने अतिक्रमणमुक्त करावी. कापड बाजार परिसरात स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नवे स्वच्छतागृह तातडीने बांधावे. तसेच सर्व सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुका डीजे सह कापडबाजारातूनच जात असतात. त्यामुळे सर्व व्यापारी, दुकानदार व नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मिरवणुकांच्या मार्गात तातडीने बदल करावा.
कापड बाजार रस्ता कॉंक्रीटीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. काँक्रीटीकरणाचे काम दीर्घकाळ चालणारे असल्याने या रस्त्याचे डांबरीकरणच करावे. नगर शहराचे वैभव असलेली कापडबाजार बाजारपेठ अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने या समस्यांकडे लक्ष देऊन कापड बाजार समस्या मुक्त करावी, अशा मागण्यांचे निवेदन महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना देऊन एम.जी.रोड व्यापारी असोसिएशनच्या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांपुढे समस्यांचा पाढा वाचला.
यावेळी एम.जी.रोड व्यापरी असोसिएशनचे सचिव किरण व्होरा, प्रेम पोखरणा, राजेंद्र रासने, संभाव काठेड, राहुल मुथा, विशाख वैद्य, जरीवाला गांधी आदी उपस्थित होते. यावेळी मनापा आयुक्त यांनी बाजारपेठेत अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्याचे नियोजन झाले असून लवकरच महानगरपालिका मोठी कारवाई हातात घेणार आहे, असे सांगून इतर समस्याही सोडवू असेही आश्वासन दिले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनांमध्ये म्हटले आहे की, राजपत्रात घोषित केल्यानुसार एमजी रोड आणि लगतचा सर्व बाजार परिसर नो हॉकर झोन आहे. तरीही मोठ्या संख्येने फेरीवाले रस्त्यावर अतिक्रमण करत आहेत. तरी एमजी रोड आणि लगतच्या रस्त्यांवरील सर्व फेरीवाले त्वरित हटवा. मनपाचे अतिक्रमण विरोधी विभाग कडक कारवाई करत नाहेये. कारवाईत काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप होत आहे. रात्री लागणाऱ्या खाद्यपदार्थांचे फेरीवाले रात्री ९ वाजण्याच्या वेळेऐवजी सायंकाळी ७ वाजता येत आहेत. त्यामुळे आमच्या दुकानसमोरील अतिक्रमणांमुळे दुकानात येण्या जाण्यासाठी पुरेशी जागाही नसते.
कापड बाजार परिसारत एकही स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. आधी मिशन कंपाउंड मध्ये पुरुषांसाठी स्वछतागृह होते. मात्र त्याचे अत्यंत दुरावस्था झाल्यने ते नवीन बांधण्याची गरज आहे. येथे स्वछताग्रहासाठी पुरेशी जागा असून चोवीस तास पाण्याची सोय असलेले नवे स्वच्छतागृह उभारावे. शहरात सर्व सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुका डीजे सह कापडबाजारातूनच जात असतात. त्यामुळे सर्व व्यापारी, दुकानदार व नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
प्रत्येक मिरवणुकीत अनेक डीजेचे डेसिमल पेक्षा जास्त आवाज असतो ज्यात लेसर लाईट्स देखील असतात ज्यामुळे आमच्या सर्व दुकान मालकांना, सेल्समनला आणि ग्राहकांना हृदय आणि डोळ्यांना मोठा त्रास होतो. डीजेच्या आवाजामुळे निऑन साइन बोर्ड, काचा तुटतात आणि जुन्या इमारतींना धोका निर्माण होत आहे. या मिरवणुकीच्या मार्गात तातडीने बदल करावा.