निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सीना नदी पात्रात केलेल्या अतिक्रमणांमुळे पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे सीना नदीतील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत. अधिवेशनामध्ये अतिक्रमण, रुंदीकरण, खोलीकरण याबाबत प्रश्न विचारला असता तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिकारी यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सिना नदीची हद्द निश्चिती झाली.
अतिक्रमण मोहीम सुरू झाली असता काही राजकीय व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगिती मिळवली. या याचिके विरोधात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडून पूर परिस्थिती माहिती द्यावी व तातडीने अतिक्रमण काढावे असे आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना आमदार संग्राम जगताप यांनी दिले.
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील काही राजकारणी व्यापाऱ्यांनी नदीमध्ये अतिक्रमण केले आहे. कालच्या पावसामध्ये अतिक्रमणामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला. त्यामुळे शहरातील बऱ्याच भागात नदीचे पाणी घरांमध्ये घुसले. त्यामुळे लोकांचे अतोनात हाल झाले असुन काही जिवितहानी घडली असती तर त्याला जबाबदार कोण? काही मोजक्या लोकांनी प्रशासनाला हाताशी धरुन नदीमध्ये खुप मोठया प्रमाणात अतिक्रमण केले आहे.
तसेच उच्च न्यायालयाची दिशाभुल करुन काही राजकीय व्यापाऱ्यांनी अतिक्रमण मोहिमेला उच्च न्यायालयाची स्थगिती मिळवली. त्याबाबत आपण पुढाकार घेऊन उच्च न्यायालयाला सत्य परिस्थिती अवगत करणे अत्यंत गरजेचे आहे असे निवेदनात आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.