मुंबई | नगर सह्याद्री
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारने या निर्णयाची आज (दि.1 जुलै) विधीमंडळात औपचारिक घोषणा केली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध आता रद्द करण्यात येत असून, उत्सवासाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यभरातील गणेश मंडळांना आणि गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरवर्षी उत्सव काळात लागू होणारे वेळेचे बंधन, ध्वनी मर्यादा, आणि परवानगी प्रक्रियेतील अडचणी यावर आता लवकरच मार्ग निघणार आहे. गणेशोत्सव आता केवळ धार्मिक वा सामाजिक कार्यक्रम न राहता, राज्यस्तरीय महत्त्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून साजरा केला जाणार आहे.
गणेशोत्सवावरील निर्बंध रद्द करून 24 तास उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी पुण्याचे आमदार हेमंत रासने यांनी आज विधानसभेत केली होती. यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मोठी घोषणा केली. पंढरपुरच्या वारीप्रमाणे गणेशोत्सवाचं नियोजन केलं जावं आणि यासाठी 100 कोटींचा निधी द्यावा अशी मागणी रासने यांनी केली होती. दरम्यान विधानसभेत आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली आणि उत्सवावरील निर्बंध मुक्त करून 500 कोटींचा निधी दिला जाईल असं जाहीर केले.