अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
नैसर्गिक आपत्तीमध्ये फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना राज्य सरकारकडून विमा संरक्षित रक्कम दिली जाते. यासाठी शेतकर्यांना विहित मुदतीत विमा पोर्टलवर अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. 30 जून 2025 पर्यंत शेतकर्यांना पोर्टलवर अर्ज सादर करता येणार आहे. दरम्यान, यापूर्वी या योजनेत विमा पोर्टल 13 जूनला सुरू झाले तर 14 जूनला विमा भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली होती त्यात आता 30 जूनपर्यंत वाढ करण्यात आल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
सरकारकडून हवामान आधारित फळपीक विमा योजनेत डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष या आठ फळपिकांना विमा संरक्षण देण्यात येते. या विमा योजनेत शेतकर्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले. मात्र, यातील संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष या पिकांच्या विम्या बाबत 13 जून रोजी सायंकाळी राज्याने जिल्हा कृषी विभागाला तर तालुका कृषी विभागाने गाव पातळीवरील कृषी विभागाला कळवले होते. संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष पिकांसाठी 14 जूनपर्यंतच मुदत देण्यात आली होती. तर चिकू, मोसंबी पिकांसाठी 30 जून, डाळिंब पिकाला 14 जुलै तर सीताफळ पिकाला 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
दरम्यान, राज्य शासनाने 14 जून रोजी केंद्रीय कृषी विभागाकडे पत्र सादर करून संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष पिकांची विमा भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विमा प्रभागामार्फत राज्यातील शेतकर्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. खरीप हंगाम 2025 अंतर्गत संत्रा, पेरू, लिंबू व द्राक्ष या फळपिकांची मौसम आधारित फळ पीक विमा योजना अंतर्गत नोंदणी करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.