पारनेर । नगर सहयाद्री
जाणत्या राजांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना केल्या, मात्र प्रत्यक्षात निधी देण्याबाबत उदासीनता दाखवली, अशी टीका जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कुकडी कालव्याच्या कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद न झाल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील ४९ गावांसाठी सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी तब्बल १ कोटी ८५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाला. महायुती सरकारने या कामांसाठी एकूण ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यातील १ ते ६० किलोमीटर कालव्याच्या कामासाठी ८२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही कामे वर्षभरात पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी आमदार काशिनाथ दाते, आमदार शरद सोनवणे, जेष्ठ नेते बबनराव पाचपुते, खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, मुख्य अभियंता संजीलनव चोपडे, अधीक्षक अभियंता अलका अहीरराव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले, १९८२ पासून या कालव्यांना निधी मिळालेला नाही. अनेकांनी फक्त भाषणे करून गावागावांतील शेतकऱ्यांची दिशाभूल केली. कालव्यांच्या कामांतील दिरंगाईमुळे पाण्याची जवळपास ४० टक्के गळती होत आहे. १८०० क्युसेसने वाहणारा कालवा आज फक्त १४०० क्युसेसवर आला आहे. शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.
अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले. पाणी असेल तर विकास आहे. रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली. कामगार देशोधडीला कोणी लावले. मुंबईत बसून कारखाने चालतात का? असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली. तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली. तालुक्यातील ४९ गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.
आ. काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली असून सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. आ. शरद सोनवणे म्हणाले, कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे. आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया त्यांनी आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे सांगितले.



