पुणे / नगर सह्याद्री :
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. मागील पाच दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने कहर केला आहे. मुंबईमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर रेल्वे रूळावर पाणी साचलेय. तर पुण्यामध्ये आभाळ फाटल्यागत पाऊस पडला आहे. पुढील तीन दिवस आणखी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवणयात आला आहे.
पावसाचा जोर पुढील ४८ तास कायम राहण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने पूरपरिस्थिती आणि पाणी साचण्याच्या समस्येवर लक्ष ठेवले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रात सततच्या मुसळधार पावसामुळे नवीन हवामान इशारे जारी केले आहेत.
राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढला असून, खालीलप्रमाणे इशारे देण्यात आले आहेत:
रेड अलर्ट (अति मुसळधार पाऊस ≥ २०४.५ मिमी): मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे (घाट क्षेत्र), सातारा (घाट क्षेत्र)
ऑरेंज अलर्ट (मुसळधार ते अति मुसळधार पाऊस ११५.६–२०४.४ मिमी): सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे (शहरी भाग), कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव
यलो अलर्ट (मुसळधार पाऊस ६४.५–११५.५ मिमी): पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड
खबरदारीचे उपाय काय?
मुसळधार पाऊस आणि वादळादरम्यान प्रवास टाळा.
विजेच्या कडकडाटात घराबाहेर निघू नका आणि खिडक्यांपासून दूर रहा.
सैल वस्तू सुरक्षित करा आणि झाडाखाली आश्रय घेऊ नका.
आपत्कालीन किट तयार ठेवा आणि अधिकृत हवामान सूचनांचे पालन करा.
मुंबईला रेड अलर्ट –
मुंबईत रविवारी रात्रीपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली. सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. सध्या मुंबईसह उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. हवामान खात्यानं मुंबईसाठी उद्या, मंगळवारी सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत गरजेचे असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे. गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.