नगर सह्याद्री वेब टीम
: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या आयपीएल २०२५ च्या जेतेपदानंतर बंगळुरूमध्ये आयोजित विजयी रॅलीला मोठ्या दुर्घटनेने गालबोट लागले. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना बोवरिंग आणि व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाच्या आनंदाला गालबोट लागले आहे.
दरम्यान, हजारो चाहते एकत्र आले होते आणि स्टेडियमबाहेर अचानक गोंधळ निर्माण झाला. अफवा आणि व्यवस्थेचा अभाव यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेवर आरसीबी संघाकडून मोठी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
काय म्हटलं आहे निवेदनात?
“आज दुपारी संघाच्या आगमनाच्या वेळी बेंगळुरूमध्ये लोकांच्या गर्दीमुळे घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. प्रत्येकाची सुरक्षितता आणि सर्वजण बरे असणं आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आरसीबी या दुःखद मृत्यूबद्दल शोक व्यक्त करते आणि पीडित कुटुंबांना मनापासून संवेदना व्यक्त करते. परिस्थितीची कल्पना होताच आम्ही तातडीने आमचे वेळापत्रक सुधारित केले आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे पालन केले. आम्ही आमच्या सर्व समर्थकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करतो, असे या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, १८ वर्षानंतर आयपीएलचा किताब जिंकल्याने आरसीबीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता. कर्नाटक सरकारसह आरसीबीकडून बेंगळुरुमध्ये विजयी मिरवणुकीचे जंगी नियोजन करण्यात आले होते. यावेळी उत्साही चाहत्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
चेंगराचेंगरीत एका मुलासह ११ जणांचा मृत्यू
४ जून रोजी दुपारी ३:३० वाजता विजयी मिरवणूक आणि स्टेडियममधील समारंभासाठी हजारो चाहते चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. रॅलीसाठी नियोजित खुल्या बसचा कार्यक्रम बंगळुरूच्या वाहतूक समस्येमुळे रद्द करण्यात आला, तरीही चाहत्यांनी गेट नंबर ३ जवळ प्रचंड गर्दी केली. यामुळे संध्याकाळी ५ ते ६ च्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका मुलासह ११ जणांचा मृत्यू झाला, तर जखमींना बोवरिंग आणि व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.