पंजाबचे हातून जेतेपद सहा धावांनी निसटले / कृणालसह गोलंदाजांनी साकारला ऐतिहासिक विजय
मुंबई | नगर सह्याद्री
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अखेर १७ वर्षांची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम आयपीएलच्या १८ व्या मोसामतील चॅम्पियन ठरली आहे. आरसीबीने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर ६ धावांनी मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
आरसीबीच्या या विजयासह विराट कोहली याचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्नही पूर्ण झालं आहे. आरसीबीने पंजाबसमोर १९१ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पंजाबला ७ विकेट्स गमावून १८४ धावा करता आल्या. आरसीबीने अशाप्रकारे चौथ्या प्रयत्नात फायनलमध्ये विजय मिळवला. आरसीबीच्या विजयानंतर विराट भावूक झाला. विराटला भावना अनावर झाल्या. तर दुसर्या बाजूला पंजाबची आयपीएल फायनलमध्ये पराभूत होण्याची २०१४ नंतरची ही पहिली तर एकूण दुसरी वेळ ठरली.
पंजाबची विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह या सलामी जोडीने ४३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर प्रियांश आर्या २४ रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंह याने २६ करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. आरसीबीने पंजाबला ठराविक अंतराने झटके देत शेवटपर्यंत सामन्यावरील पकड कायम ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केला. पंजाबसाठी शशांक सिंह याने पंजाबला जिंकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश आलं नाही. शशांकने पंजाबसाठी सर्वाधिक धावा केल्या. शशांकाने ३० बॉलमध्ये ६ सिस आणि ३ फोरसह नाबाद ६१ रन्स केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. मात्र त्यांचं हे योगदान आरसीबीला चॅम्पियन होण्यापासून रोखू शकलं नाही.
पंजाबसाठी शशांक व्यतिरिक्त जोश इंग्लिसने ३९ रन्स केल्या. तर नेहल वढेरा याने १५ धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त पंजाबकडून एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. आरसीबीसाठी भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्या या दोघांनी बॉलिंगने निर्णायक भूमिका बजावली. दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. रोमरियो शेफर्ड याने एकमेव मात्र श्रेयस अय्यरची सर्वात मोठी विकेट मिळवली. त्याव्यतिरिक्त यश दयाल आणि जोश हेझलवूड या दोघांनीही प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.
१८ वर्षे वाट पहायला लावलीस मित्रा ः विराट कोहली
आयपीएल २०२५ च्या सीझनमध्ये पायनल जिंकत ट्रॉफीवर नाव कोरणं हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी स्वप्नपूर्तीसारखंच होतं. १८ वर्ष वाट पाहिल्यावर अखेर आरसीबी आणि विराटचं स्वप्न साकार झालं आहे. फायनलमध्ये आरसीबीने पंजाबचा ६ धावांनी पराभव केला. या विजयानंतर विराट कोहलीने भावूक झाला होता, मैदानातच तो चक्क रडला. विजयानंतर त्याने बुधवारी सकाळी सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये त्याने मैदानावरील ट्रॉफी उचलतानाचे आणि ट्रॉफीबरोबर शूट केलेले काही फोटोही टाकले आहेत. तसेच त्याने एक भावूक पोस्टही लिहीली आहे. या संघाने स्वप्न साकार केले, हा सीझन मी कधीही विसरणार नाही. गेल्या अडीच महिन्यांतील प्रवासाचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला आहे. हे (विजय, ट्रॉफी) आरसीबी चाहत्यांसाठी आहे ज्यांनी वाईट काळातही आमची साथ कधीच सोडली नाही. ही सोडले नाही. ही ट्रॉफी इतया वर्षांचा हार्टब्रेक आणि निराशेसाठी आहे. संघ म्हणून खेळताना मैदानावर केलेल्या प्रत्येक छोट्या प्रयत्नासाठी आहे. असं विराटने लिहीलं. आयपीएल ट्रॉफीबद्दल मी काय बोलू, मित्रा, ही ट्रॉफी उचलून आनंद साजरा करण्यासाठी मला तू १८ वर्षं वाट पाहायला लावलीस. पण या प्रतिक्षेनंतरचा आजचा आनंद अनोखा आहे, असं म्हणत विराट कोहलीने या कॅप्शनला शेवटी हार्ट, ट्रॉफीची इमोजी टाकली आहे.
विजय माझ्यासह विराट, चाहत्यांसाठी खूप खास ः कर्णधार रजत पाटीदार
मला वाटतं की हा विजय माझ्यासाठी, विराट कोहली आणि वर्षानुवर्षे पाठींबा देणार्या सर्व चाहत्यांसाठी खूप खास आहे. ते त्यासाठी पात्र आहेत. क्वालिफायर १ मॅचनंतर आपण जिंकू शकतं वाटलं. मला वाटतं की या ट्रॅकवर १९० धावा हा चांगला स्कोअर होता. गोलंदाजांनी ज्या पद्धतीने त्यांच्या योजना राबवल्या ते पाहणं जबरदस्त होतं. कृणाल पंड्या विकेट्स घेणारा बॉलर आहे. मी जेव्हा जेव्हा दबावात येतो तेव्हा मी केपीकडे (कृणाल पंड्या) पाहतो. सुयशनेही संपूर्ण हंगामात खूप चांगली गोलंदाजी केली, असं म्हणत रजतने फिरकी जोडीचं कौतुक केलं. कृणालने अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी २ विकेट्स घेतल्या. तसेच रजतने वेगवान गोलंदाजांचं नाव घेत त्यांना श्रेय दिलं. भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड आणि रोमारियो शेफर्ड. रोमरियो ज्या पद्धतीने आला आणि त्याने २-३ ओव्हर टाकून ब्रेकथ्रू दिला ते खास होतं, असंही रजतने म्हटलं.
अनुष्काने मिठी मारताच विराट ढसाढसा रडला
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना (३ जून २०२५) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळण्यात आला. एका रोमांचक सामन्यात आरसीबीने ट्रॉफी जिंकली. ठउइच्या विजयानंतर सर्व टीमने जल्लोष करत हा आनंद साजरा केला. स्टेडियमवर ठउइचे सर्व खेळाडू आनंदी तर दिसतच होते पण सोबतच सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.आरसीबीच्या विजयानंतर सर्वात जास्त भावूक झालेला दिसला तो म्हणजे विराट कोहली. पहिल्यांदा आयपीएल जिंकल्यानंतर विराट कोहलीला इतका आनंद झाला की अक्षरश: तो त्या क्षणी मैदानावर ढसाढसा रडू लागला. विराटने सर्व खेळाडूंना मिठी मारत आनंद साजरा केला पण तेव्हा त्याच्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबत नव्हते. पण खरा क्षण तेव्हा पाहायला मिळाला जेव्हा अनुष्का धावत मैदानावर उतरली आणि तिने विराटला घट्ट मिठी मारली, त्यावेळी, तिच्या चेहर्यावर अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. तिने विराटला मिठी मारताच विराट एखाद्या बाळासारखा ढसाढसा रडू लागला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. अनुष्का शर्मानेही तिच्या पतीचा विजय साजरा केला.
आरसीबीची बॅटिंग, ‘विराट’ योगदान
पंजाब खेळण्यापूर्वी आरसीबीने २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १९० रन्स केल्या. आरसीबीसाठी विराट कोहली याने सर्वाधिक ४३ रन्स केल्या. तर फिलीप सॉल्ट,मयंक अग्रवाल, कर्णधार रजत पाटीदार, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा आणि रोमरियो शेफर्ड या फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठत आरसीबीला १९० धावांपर्यंत पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली. तर पंजाबसाठी अर्शदीप सिंह आणि कायले जेमिन्सन या दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर अझमतुल्लाह ओमरझई, विजयकुमार वैशाख आणि युझवेंद्र चहल या तिघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.