राळेगणसिद्धी । नगर सहयाद्री
अहमदाबाद येथे १२ जून २०२५ रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात २६० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यंदा १५ जून रोजी होणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १६ जूनला नियोजित सामाजिक सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकाद्वारे दिली.
त्यांनी दिलेल्या पत्रकात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये भूकंपानंतर केंद्र सरकारच्या नियोजन आयोगावर काम करत असताना मी अहमदाबादमध्ये सुमारे सहा महिने वास्तव्य केले होते आणि संपूर्ण गुजरात राज्यात फिरलो होतो. त्या शहराशी असलेल्या भावनिक संबंधामुळे १५ जून रोजी होणारा वाढदिवस साजरा करू नये असे अहवाना त्यांनी केले आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे देखील या अपघातात निधन झाले आहे.अशा कठीण प्रसंगी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणारा सामाजिक सेवा पुरस्कार सोहळा देखील पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांना या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो,असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.