मुंबई / नगर सह्याद्री :
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युती होणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनीही तशा प्रकारचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुतोवाच केलेले आहे. विशेष म्हणजे मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यास आगामी काळातील राजकारण बदलू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. मुंबई महापालिकेच्या तसेच एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता या दोन्ही बंधूंची युती प्रत्यक्षात नावारुपाला आली आहे. विशेष म्हणजे या युतीचा फॉर्म्यूलाही समोर आला आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन विरोधी बाकावरील महायुतीच्या तिन्ही घटकपक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मनसे आणि ठाकरे गटानेही आपापल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. युतीचं काय करायचं ते आम्ही बघू. हा निर्णय आमच्यावर सोडा. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, असं नुकतेच उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच मनसेचे राज ठाकरे यांनीही ठाकरे गटासोबतच्या युतीचा निर्णय माझ्यावर सोडा. मी योग्य भूमिका घेऊन ती जाहीर करेन, असं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ही युती कधी नावारुपाला येणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
दोन्ही ठाकरे एकत्र आले, आता लवकरच…
दरम्यान, लवकरच मुंबईतील बेस्ट कामगार मतपेढीची निवडणूक होणार आहे. याच निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी युती केल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्यात जागावाटपही ठरले असल्याचे बोलले जात आहे. उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार आहेत. या युतीमध्ये जागावाटपावर आजच (7 ऑगस्ट) शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीत एकूण 21 जागांपैकी 19 जागांवर उद्धव ठाकरेंची कामगार सेना निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर उर्वरित 2 जागा मनसेच्या बेस्ट कामगार संघटनेला देण्यात येतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.