मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद होत आहे. पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि रायगड या भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि पुण्यातही पावसाची सुरुवात झाली असून काही भागांत हलक्याफुलक्या सरी कोसळत आहेत.रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाबळेश्वर, पोलादपुर परिसरात कोसळणाऱ्या जोरदार पावसाने सावित्री नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. केवळ तीन तासात तीन मिटर ने पाणी पातळी वाढली असून प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 15 जुलै रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट
पुणे जिल्ह्यासाठी आज (दि.15) रेड अलर्ट दिलेला आहे. पुणे आणि सातारा येथील घाटांमध्ये वादळांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. सोबतच मुंबई, ठाणे परिसरात हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अंधेरी परिसरात गाड्या पाण्याखाली
पश्चिम उपनगरात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सबवे बाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून वाहतूक बंद केली आहे. अंधेरी परिसरात काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगरलाही सतर्कतेचा इशारा
उत्तर नगर जिल्ह्याच्या भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. परिणामी डोंगरदऱ्यांतील धबधबे पुन्हा वाहू लागले असून पर्यटकांनी या ठिकाणी गद केली आहे. पावसामुळे संपूर्ण पाणलोट परिसरात थंडीचा अनुभव येत असून कोकणकडा, कळसूबाई शिखर धुक्याने झाकले गेले आहे. दरम्यान राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधील या भागातील नागरिकांनी देखील सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.