अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मोसमी पाऊस विदर्भासह देशातील आणखी काही भाग व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यात दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असून अहिल्यानगर जिल्ह्याला हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
मोसमी वाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून वाटचाल केलेली नाही. मोसमी वाऱ्यांची सीमा मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट या भागातच आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बुधवार (दि. ११ जून) सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने व मुसळधार पावसाने जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातले होते. संध्याकाळी सुमारे साडे सहा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील नगर, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी शेवगाव तालुक्यात अचानक वातावरणात बदल होऊन दाट ढग आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली होती.
वादळासह मुसळधार पावसामुळे अनके झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब व तारा तुटल्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वादळामुळे केळीचे पीक, कांद्याचे शेड आणि अनेक घरांचे पत्रे उडून गेले. सोलर प्लेटचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या केळी पिकावर मोठा परिणाम झाला आहे. शेवगाव तालुक्यातील एका गावात बैलगाडीवर झाड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. पावसाचा जोर इतका होता की, १५ ते २० मिनीटामध्ये रस्ते पाण्याने भरून वाहू लागले. पावसाने शेतात पाणी साचल्यामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते.
दरम्यान, आजपासून (ता. १३) राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांसह उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.