पारनेर । नगर सहयाद्री
चोंभूत येथील कोल्हे मळा परिसरातील ओढ्यावर सिमेंटी पाईप टाकून तयार करण्यात आलेला छोटा पूल पावसामुळे वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात पूर्णतः वाहून गेला आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
या परिसरातील नागरिकांना गावात येण्यासाठी आणि शेतात जाण्यासाठी याच पुलाचा मुख्य मार्ग म्हणून उपयोग होत होता. विद्यार्थ्यांसाठी देखील ही एकमेव शाळेकडे जाण्याची वाट आहे. मात्र पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना ओढा पार करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने नवीन पूल बांधण्याची अथवा सध्या पूल दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, पावसाळ्यापूवच योग्य दुरुस्ती झाली असती, तर आज ही समस्या उद्भवली नसती.प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अन्यथा, भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.