नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून वारंवार केला जात आहे. अशातच आज राहुल गांधी यांनी कर्नाटकातील आणखी एका मतदारसंघातील आकडेवारी देत खळबळजनक दावा केला आहे. आपल्या आरोपाला आधार म्हणून राहुल गांधी यांनी या मतदारसंघातील एका व्यक्तीलाही आपल्यासोबत पत्रकार परिषदेत सादर केले.
देशातील लोकशाही उद्ध्वस्त करणार्या व्यक्तींना केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कसं पाठीशी घातलं, याचा पर्दाफाश मी करणार आहे. मी लोकसभेचा विरोधी पक्षनेता आहे आणि अत्यंत जबाबदारीने पुराव्यांनिशी मी बोलत आहे. निवडणुकांमध्ये ठरवून अनेकांची नावे मतदारयाद्यांमधून काढली जात आहेत, तर काही नाव ठरवून समाविष्ट केली जात आहे. नावे काढताना दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय समाजाला लक्ष्य केलं जात आहे. हे आधीही आढळून आलं होतं आणि आता हे सत्य असल्याचे आमच्याकडे १००० टक्के पुरावे आहेत. मी असा व्यक्ती आहे जो आपल्या देशावर प्रेम करतो, संविधानावर प्रेम करतो, लोकशाहीवर प्रेम करतो. त्यामुळे मी ज्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, त्याबाबतच इथं बोलणार आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी मतदारयाद्यांतून कशा प्रकारे काँग्रेस समर्थक लोकांची नावे डिलिट करण्यात आली, याबाबतचे आरोप केले आहेत.
कोणत्या मतदारसंघात काय घडलं?
मतचोरीचा आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटकात आलंद नावाचा एक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कोणीतरी ६ हजार १८ मते डिलिट करण्याचा प्रयत्न केला आणि हा चोर सापडला. या मतदारसंघात झालं असं की, बूथस्तरावर काम करणार्या एका महिला अधिकार्याच्या काकांचे नाव मतदार यादीतून डिलिट करण्यात आले होते. त्यामुळे हे नाव कोणी डिलिट केले, याची माहिती सदर अधिकार्याने काढण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, शेजारी राहणार्या व्यक्तीने हे नाव मतदार यादीतून डिलिट केल्याचं लक्षात आलं. त्यामुळे अधिकार्याने त्या शेजारच्या व्यक्तीकडे विचारपूस केली. परंतु मी असं काहीही केलं नसल्याचं शेजार्याने सांगितलं. हे मत शेजार्याने डिलिट केले नव्हते तर यासाठी एक वेगळी शक्ती काम करत होती, असा दावा राहुल गांधींनी केला आहे.
कशी डिलिट करण्यात आलं नावं?
कर्नाटकातील आलंद मतदारसंघात ६ हजार १८ मते डिलिट करण्यासाठी विविध लोकांच्या नावे अर्ज करण्यात आला होता. परंतु ज्या लोकांच्या नावाने अर्ज करण्यात आला होता त्या लोकांनी प्रत्यक्षात असा अर्ज केलाच नव्हता. त्या लोकांच्या नावाचा वापर करून बाहेरच्या राज्यातून हे अर्ज करण्यात आले होते आणि जिथं काँग्रेसची ताकद आहे अशा बूथवरील मतदारांची नावे अत्यंत शिताफीने डिलिट करण्यात आली. सूर्यकांत नावाच्या व्यक्तीच्या नावाने अर्ज करून १२ मते डिलिट करण्यात आली. मात्र सूर्यकांत यांना याबाबतची कोणतीही कल्पना नव्हती, असं सांगत ज्या सूर्यकांत यांच्या नावाने ही नावे डिलिट करण्यात आली त्या सूर्यकांत यांना राहुल गांधींनी माध्यमांसमोर बोलावलं आणि त्यांनाच याबाबत अधिक माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर मी मते डिलिट करण्यासाठी कोणताही अर्ज केला नव्हता, असं सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने म्हटलं आहे.