अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
ग्रामविकास विभागाच्या आदेशानूसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या प्रभाग रचनेसाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. यात जिल्हा व तालुका समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी राहणार आहेत. समिती स्थापन झाल्याने आता प्रशासकीय पातळीवर प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे. दरम्यान प्रभाग रचनेचे काम सुरू होणार असल्याने आता राजकीय पक्षाकडून देखील निवडणूक हालचालींना वेग आला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे. ग्रामविकास खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 75 गट तर पंचायत समितीचे 150 गण राहणार असल्याचे स्पष्ट करून प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 14 जुलैला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली जाईल. 18 ऑगस्ट 2025 रोजी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे द्यावा, असे आदेश ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले दिले होते. त्यानूसार आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रभाग रचना तयार करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले असून समितीची सदस्य कोण असणार हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंगळवारी आदेश काढले आहेत.
यात आदेशात जिल्हा व तालुकास्तरीय समितीचे अध्यक्षपद हे जिल्हाधिकारी यांच्याकडे राहणार आहे. तर जिल्हा समितीमध्ये उपजिल्हाधिकारी महसूल, तहसीलदार सामन्य प्रशासन व संगणक तज्ज्ञ हे सदस्य असणार आहेत. त्याप्रमाणे तालुकास्तरावर जिल्हाधिकारी अध्यक्ष राहणार असून सदस्य म्हणून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायक तहसीलदार (जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक काम पाहणारे), संगणक तज्ज्ञ असे पाच जण तालुकास्तरावर तर चार जण जिल्हास्तरीय समितीमध्ये राहणार आहे.
प्रारुप प्रभाग रचना राज्य शासनाच्या आदेशानुसार व योग्य ती दक्षता घेऊन तयार करण्याची जबाबदारी संबंधित समितीवर राहणार आहे. प्रारूप तयार करणे, तहसीलदारांनी तयार केलेला कच्चा आराखडा प्रभाग रचना समितीसमोर ठेवण्यात येईल, ही समिती हा अधिनियमातील तरतूदी, नियमातील तरतूदी व या आदेशातील तरतूदींचे पालन करून तयार केला आहे हे तपासले. ही समिती प्रारूप प्रभागर रचनेचे नकाशे योग्य रितीने तयारद करून तपासून पाहिले.
अन्यथा योग्य नकाशे तयार करून घेण्याची कार्यवाही करेल, प्रभाग रचना पूर्वतयारीची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांच्यावर राहणार आहे. त्यानुसार आता प्रभाग रचनेच्या कामाला सुरवात झाली आहे. प्रभाग रचनेच्या कामाला सुरवात झाल्याने राजकीय पक्षांनी देखील निवडणूक हालचालींना सुरवात केली असून गावानिहाय कार्यकर्ते व बुथ समितीच्या तयारी केली जात आहे.