मुंबई । नगर सहयाद्री:-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर तिखट हल्ला चढवला. पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीयांचे रक्त अजून सुकले नाही. त्यांचे घाव भरले नाहीत. पण त्यानंतरही केंद्र सरकार पाकशी क्रिकेट खेळून देशभक्तीचा व्यापार करत आहे, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे. पण अजूनही पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे जखमांचे घाव भरलेले नाहीत, त्या हल्ल्यातील शहीद जवानांचे रक्त अजूनही सुकलेले नाही. त्या घटनेनंतर आम्हाला वाटले होते की, पाकिस्तानचे दोन-तीन तुकडे होतील. त्यावेळी एक चढाई झाली होती, त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते, असं त्यांनी सांगितलं.
दरवेळी पाकिस्तानकडून हल्ला होतो, आपले सैनिक शौर्याने लढतात, काही जण शहीदही होतात. पण तेव्हा डोनाल्ड ट्रम्प सांगतो की, त्यांनी युद्ध थांबवलं. एकदा नीरज चोप्रा यांनी पाकिस्तानी प्रशिक्षक घेतला होता, तेव्हा त्या प्रशिक्षकाला देशद्रोही ठरवलं गेलं. आणि आता त्याच पाकिस्तानसोबत आपण क्रिकेट खेळतोय? जो पाकिस्तान सातत्याने दहशतवाद पसरवत आहे, त्याच्याशी आपण संबंध ठेवतो? मग आपण तिथे शिष्टमंडळ पाठवलं होतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अजूनही संधी आहे, त्यांनी या सामन्यावर बहिष्कार घालावा आणि देशाला योग्य संदेश द्यावा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
उद्या जय शाह सामना पाहायला जातील, तर त्यांना देशद्रोही म्हणायचं का? भाजप इतकी निर्लज्ज झाली आहे की, उद्या सामना सुरू असताना जाहिरातीत ‘सिंदूर’ दाखवायला देखील कमी पडणार नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. “उद्या होणाऱ्या आंदोलनाचं शीर्षक आहे ‘माझं कुंकू, माझा देश’. कारण क्रिकेटच्या सामन्यात विकेट गेली तर दुसऱ्या सामन्यात संधी मिळते. पण जवान शहीद झाले, तर त्यांच्या कुटुंबांचे आयुष्य उजाडून जातं. ही व्याख्या भाजपला कळत नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील भेटीवरही भाष्य केले आहे. “जर मातोश्रीवर जावेद मियाँदादच्या येण्यावरुन भाजप टीका करत असेल तर मला विचारायचं आहे की, त्यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का? असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.