अहिल्यानगर । नगर सहयाद्री
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून पंढरपूरकडे जाणार्या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या रथाला काल दि. 3 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पंढरपूर जवळील भोसे गावानजीक एका पिकअप गाडीने जोराची धडक दिली. या घटनेत पाच वारकरी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील श्री दत्त सेवा पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे जात असताना बुधवारी रात्री पंढरपूर जवळील भोसे गावात दिंडीचा मुक्काम होता. काल दि. 3 जुलै रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास दिंडी पंढरपूरकडे निघाली. तेव्हा करकंब ते पंढरपूर जाणार्या रोडवर भरधाव वेगात आलेल्या एका पिकअप गाडीने दिंडीतील रथाला जोराची धडक दिली.
यावेळी रथ उलटून दिलीप आडगळे, सुभाष चौधरी, सुरेश पाचारणे, भाऊसाहेब शेजूळ, देवराम निकम, सर्व रा. टाकळीमिया, ता. राहुरी, हे पाच वारकरी जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सुभाष चौधरी यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी तात्काळ अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन जखमी वारकर्यांची विचारपूस केली.
अपघातग्रस्त वारकर्यांना लोकप्रतिनिधी आणि शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी. तसेच या वारकर्यांच्या उपचारासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावच्या सरपंच सौ.लीलाबाई गायकवाड, शामराव निमसे, केशवराव शिंदे, रविंद्र मोरे, प्रताप निमसे यांच्यासह स्वामी अखंडानंद महाराज दिंडी व शंकर पार्वती दिंडीतील वारकर्यांनी केली आहे.