spot_img
अहमदनगरपुढील चोवीस तासांत ठेवीदारांचे पैसे द्या, आम्ही पाठिंबा द्यायला तयार!

पुढील चोवीस तासांत ठेवीदारांचे पैसे द्या, आम्ही पाठिंबा द्यायला तयार!

spot_img

गोरेश्वर सहकार बचाव पॅनलचे प्रमुख बाबासाहेब तांबे यांचा विरोधकांवर हल्लाबोल
पारनेर | नगर सह्याद्री
पतसंस्था ताब्यात घेऊन त्यावर तुम्हाला तुमचे पोटपाणी चालवायचे आणि तुम्ही तेच करत आला आहात हे संपूर्ण जिल्ह्याने अनुभवले आहे. भाग्योदय पतसंस्था बुडवल्याचा माझ्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांनी जरा भाग्योदयच्या नुसार माझे अनुकरण करावे. ज्याप्रमाणे मी स्वतः पदर झळ सोसून भाग्योदयच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत केल्या. त्याप्रमाणे बाजीराव, त्याचा मुलगा आणि आता त्याच्या सहानुभूतीचा कटोरा हातात घेऊन फिरणाऱ्यांनी त्यांच्या प्रॉपट विकून गोरगरीब ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत कराव्यात. पुढील चोवीस तासात सर्व ठेवीदारांच्या ठेवी तुम्ही दिल्यास मी आमच्या मंडळाचा पाठींबा तुम्हाला जाहीर करतो. शब्दाला पक्का मी आणि माझे उमेदवार- समर्थक आहेत. चोवीस तासाच्या आत माझे हे आव्हान तुम्ही पूर्ण करा. गोरेश्वर पतसंस्था हा राजकारणाचा अड्डा मला करायचा नाही आणि केलाही नाही. सभासद, ठेवीदारांचे हित हेच माझे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. त्यातूनच विरोधकांनी आमचे हे आव्हान स्वीकारावे. गोरेगावकरांच्या प्रेम, आशिर्वाद आणि शुभेच्छांच्या जोडीने तालुक्यातील अनेक सहृदयी मित्र आणि त्यांचा स्नेह मला मिळाला. अनेकांच्या सुखदु:खात सहभागी होता आले आणि तीच शिदोरी आजही माझ्या सोबत आहे आणि उद्याही राहणार आहे. तुमचे काय? तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथेही तुम्ही डमी गुरुजी नेमला! ज्याला नेमले तो गोरेश्वरचा कर्मचारी! तुमची भानगड बाहेर येताच तुमच्यावर गुन्हा दाखल झाला. ज्याला तुमच्या जागेवर डमी मास्तर केले, त्याला तर तुम्ही पतसंस्थेतून का काढले? त्याचा दोष काय होता हेही एकदा जनतेसमोर येऊ द्या असे जाहीर आव्हान गोरेश्वर सहकार बचाव पॅनलचे प्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी विरोधकांना दिले.

ढवळे, आझाद अन्‌‍ बाजीरावचा एकत्रित सातबारा कसा? हेही समोरासमोर येऊन सांगा!
स्वच्छ चारित्र्याचा कांगावा करणाऱ्या बाजीराव समर्थकांनी मौजे रांजणगाव गणपती (शिरुर) येथील गट नं. 1181, 1182 हे सातबारा जनतेसमोर मांडण्याचे धाडस करावे. या उताऱ्यावर राजे शिवाजी घोटाळ्यातील मास्टरमाईंड पोपट ढवळे याच्या कुटुंबातील सागर ढवळे, कविता ढवळे, रंजना ढवळे, सुनिता ढवळे आणि आझाद ठुबे यांच्या जोडीने संकेत बाजीराव पानमंद, वर्षा बाजीराव पानमंद यांची नावे आहेत. बाजीरावचा मुलगा आणि पत्नी या दोघांनी ही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी करताना त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत काय होते हेही सभासदांसह गावकऱ्यांना समजू द्या!

गोरेश्वरची वाटचाल संपदाच्या दिशेने चालू असल्याची चाहूल लागल्याने त्यांनी राजीनामे दिले!
आमच्यावर मागील वेळी निवडणूक लावल्याचा आणि राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप धादांत खोटा आहे. आमचे संचालक संस्थेत गेल्यामुळेच राजे शिवाजी पतसंस्थेतील साडेआठ कोटीच्या नियमबाह्य ठेवी ठेवल्याचे उघडकीस झाले. बिनविरोध संचालक मंडळ होते. या मंडळाच्या पहिल्याच वार्षिक सभेमध्ये संस्थापक संचालकांमधील काही असंतुष्ट संचालकांनी चेअरमन बाजीराव पानमंद यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. संस्था टिकली पाहिजे आणि चुकीचा संदेश बाहेर जाऊ नये अशी भूमिका आमच्या समर्थक संचालकांनी घेतली. त्या आरोपांमध्ये शंभर टक्के सत्य होते आणि त्याचे पुरावेच बाजीराव समर्थकांनीच सभेमध्ये मांडले असतानाही आम्ही शांत राहिलो. कारण, आम्हाला हे भांडण आणि चुकीचा कारभार चव्हाट्यावर येऊ द्यायचा नव्हता. राजेशिवाजी पतसंस्थेत नियमबाह्यपणे साडेआठ कोटी ठेवल्या नसत्या आणि त्या पुन्हा स्वत:च्या मजनुसार वळवल्या नसत्या तर त्यांची आज नाशिकची तुरुंगवारी झालीच नसती. मात्र, लांडग्याच्या जीभेला रक्त लागले की तो जसा सैरभैर सुटतो तसे यांचे झाले होते आणि त्यात आपण अडकलो तर संपदा पतसंस्थेत वाफारेच्या घोटाळ्याने साऱ्यांनाच जशी तुरुंगवारी झाली, तशी होऊ नये म्हणून आम्ही लेखापरीक्षणाची चेअरमनकडे केलेली मागणी त्यांनी मान्य केली नाही आणि त्यातूनच मग आम्ही सहकार आयुक्तांना पत्र लिहून सामूहिक राजीनामे दिले.

बाजीराव कोणत्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे, हे सांगण्याची हिम्मत दाखवा!
गोरेश्वरमधील आमच्या संचालकांनी साडेआठ कोटीचा जाब विचारल्यानंतर यांनी राजे शिवाजी पतसंस्थेत पैसे पाठवल्याच्या एक वर्षांनंतरच्या तारखेच्या पावत्या करून ठेव असल्याचे भासवले. त्यातच आम्हाला संशय आला. राजे शिवाजी प्रकरणात आमचा संबंध नाही असे आता ही मंडळी प्रचार आणि गाठीभेठीमधून सांगत आहेत. गोरेश्वर देवस्थानला जर तुम्ही मानत असाल तर बाजीराव कोणत्या गुन्ह्यात काही महिन्यांपासून जेलमध्ये आहे, हे चौकात जाहीर सभा घेऊन सांगण्याचे धाडस करावे आणि आम्ही सपशेल माघार घेऊ.

पतसंस्थेचा ताबा मारून विक्री करण्याचा डीएनए तुमच्यातच!
आमच्यावर पतसंस्थेचा ताबा मारून विकतील असा आरोप करणाऱ्यांनी कोणतेच राजकारण नसणाऱ्या आणि कोणाचाच हस्तक्षेप नसणारी, संपूर्णपणे बाजीरावचा एक हाती अंमल असणारी गोरेश्वर मल्टीस्टेट विकली. मल्टीस्टेट पूर्णत: गावकऱ्यांसह साऱ्यांना अंधारात ठेवत स्थापनही केली आणि त्या संस्थेची विक्रीही केली. स्थापना ते विक्रीपर्यंत कोणालाच त्याचा मागमूस लागू दिला नाही. तुरुंगात जाण्याआधी या मल्टीस्टेटचा विक्री सोहळा दिमखदार फेटा बांधून केला हेही विसरले की काय? मल्टीस्टेटच्या विक्रीतून आलेले कोट्यवधी रुपये मुलगा- सुनबाई अन्‌‍ पत्नीच्या नावाने कसे आले हेही आम्हाला जनतेसमोर मांडावे लागेल! मुळातच पतसंस्थेवर तुम्हाला पुन्हा यासाठीच ताबा मारायचा आहे की, तुम्हाला या संस्थेची देखील विक्री करायची आहे. कारण संस्था विकण्याचा दांडगा अनुभव तुम्ही दोन- तीन महिन्यांपूवच घेतलाय. त्या अनुभवाची शिदोरी तुमच्याकडे आहे, म्हणजेच तुमच्यातच पतसंस्थेचा ताबा मारण्याचा आणि तिची विक्री करण्याचा डीएनए आहे हे सभासदांसह ठेवीदारांच्याही लक्षात आले आहे.

घोटाळा नव्हता तर मग तुम्ही तुमच्या मालमत्ता का फिरवल्या हे गोरेश्वरच्या मंदिरात येऊन शपथेवर सांगा, आम्ही आजही माघार घेतो!
चेअरमनच्याच समर्थकांनी वार्षिक सभेत त्यांच्या भ्रष्ट कारभाराचा भांडाफोड केला. त्यातून ठेवीदार संभ्रमावस्थेत आले. आपला राजे शिवाजी पतसंस्थेच्या घोटाळ्यात संबंध निघणारच आहे, या भीतीने चेअरमन यांनी आपल्या मालमत्ता जवळच्या नातेवाईकांच्या नावे करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या वर्तनाने आणि संस्थापक संचालकांमधील दुहीमुळे ठेवीदारांनी ठेवी काढण्यास सुरुवात केली. ठेवीदार ठेवी मागण्यास गद करत असताना चेअरमन यांनी आपल्या नातेवाईकांच्या लाखो रुपयांच्या ठेवी सर्वात आधी काढून दिल्या. गरजवंतांना थोड्या थोड्या रकमा देण्याचे संचालकांच्या बैठकीत ठरले असताना कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चेअरमनने रात्री अपरात्री नातेवाईकांच्या ठेवी आरटीजीएसद्वारे परत केल्या. गोरगरिबांना छोट्या छोट्या ठेवी मिळेनात, त्यामुळे संस्थेची घडी कोलमडली. बाजीराव पानमंद यांच्या मनमानी आणि अत्यंत भ्रष्ट कारभारामुळे पतसंस्थेची घडी विस्कटली. संस्थेत काहीच घोटाळा नव्हता तर मग तुम्ही तुमच्या मालमत्ता का फिरवल्या हे गोरेश्वरच्या मंदिरात येऊन शपथेवर सांगा, आम्ही आजही माघार घ्यायला तयार आहोत.
– पंकज कारखिले, सरपंच, राळेगण थेरपाळ

दीड एकर जमिनीवर पाच कोटी र 20 लाखांचे कर्ज कसे दिले?
सामान्य व्यक्ती कर्ज घ्यायला आल्यानंतर त्याच्या दहा लाखाच्या कर्जासाठी पन्नास लाखांची मालमत्ता गहाणखत करुन घेतली जाते. मात्र, बाजीराव चेअरमन असताना त्यांनी दीड एकर जमिन तारण घेतली आणि याच दीड एकर जमिनीवर बोजा चढवत मौजे रांजणगाव गणपती (शिरुर) येथील गट नं. 1181, 1182 या गटातील जमिनीवर तब्बल 5 कोटी 20 लाख रुपयांचे कर्ज दिले. हे कोणत्या नियमात होते?
– बाळासाहेब नरसाळे,
(संचालक, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक)

तुमच्यासारखा डल्ला मी मारला असता तर गावकऱ्यांनी सलगपणे मला कौल दिला असता का?
विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नाही. भाग्योदयचा मुद्दा उकरुन काढणाऱ्यांनी जरा इतिहासाची पाने चाळण्याची गरज आहे. त्यावेळी आम्ही सहकारात नवीन होतो. त्यावेळी आमचा हा निर्णय चुकत असल्याचे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पदरमोड करत ठेवीदारांचे पैसे दिलेत! एक छदाम देखील कोणाचा ठेवला नाही. भाग्योदयमध्ये गावातीलच म्हणजेच गोरेगावमधील ठेवीदार होते. बाहेरचे नव्हते. भाग्योदय दुसऱ्या पतसंस्थेत विलीन केली गेली. या दरम्यान, गोरेगावमध्ये दोनदा ग्रामपंचायत निवडणूक झाली. या सर्व निवडणुका माझ्याच नेतृत्वाखाली झाल्या आणि आम्ही त्या जिंकल्याही! मी जर चुकीचा वागलो असतो आणि तुमच्यासारखा ठेवीदारांच्या ठेवीवर डल्ला मारला असता तर गावकऱ्यांनी मला कौल दिला नसता!

पोपट ढवळेसह स्वत:चा मुलगा आणि आझादच्या मुलाचे कोट्यवधींचे विनातारण कर्ज कसे?
राजे शिवाजी पतसंस्था घोटाळ्याचा मास्टर माईड पोपट ढवळे यांच्याशी असलेले आर्थिक संबंध विरोधक झाकण्याचा प्रयत्न करत असले तरी गोरेश्वर पतसंस्थेच्या लेखापरीक्षणामध्ये लेखापरीक्षकांनी तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. ढवळे आणि त्यांच्या नातेवाईकांना कोट्यवधींचे कर्ज कशाच्या आधारे दिले गेले? एकाच मालमत्तेवर बोजा चढवून चार – चार पाच -पाच लोकांना कोट्यवधीचे कर्ज कसे वाटले? स्वतः पानमंद याचे कुटुंबीय आणि नातेवाईक हे पोपट ढवळे याच्या कर्जास जामीन असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. ढवळे आणि पानमंद या दोघांसह बाजीरावचा मुलगा आणि त्याच्या पत्नी यांच्या खात्यांमधून कोट्यवधींची आर्थिक देवाणघेवाण कशी झाली याचा जाहीर खुलासा करण्याची हिम्मत तुरुंगात असणाऱ्या बाजीरावमध्ये नसली तरी त्याचा वारसदार म्हणून मिरवणाऱ्या त्याच्या मुलाने दाखवावी.

फर्निचर पुरवठ्याची भानगड आम्ही नव्हे, तुमच्याच तत्कालीन सहकाऱ्याने बाहेर आणलीय!
फर्निचर पुरवठादाराच्या कमिशनमधून बंगला कसा बांधला आणि तुमच्या अलिशान बंगल्याचे फर्निचर कसे केले याचे ऑडीओ क्लीप बाहेर आली आहे. पुररठादारासोबत आम्ही नव्हे तर तुमच्या सोबत असणारे तुमचेच तत्कालीन व्हाईस चेअरमन हे बोलले. त्यांनीच हा घोटाळा बाहेर काढलाय! आम्ही नव्हे! त्यांनीच तुमची कृष्णकृत्ये पुराव्यासह बाहेर काढली. बोलणे त्या दोघांच्यातच झाले होते आणि त्यातून बाजीरावच्या भानगडी बाहेर आल्या. घोटाळ्यांचा बादशाह असणाऱ्या बाजीराव याला पुन्हा ही संस्था तुरुंगात असतानाही याच साठी हवी आहे काय?

तुमच्या पत्नीसह दोघांनी राजीनामे का दिले हेही सांगा!
आमच्या राजीनाम्याबद्दल आणि आमच्यामुळे संस्था अडचणीत आली असे सांगणाऱ्यांनी बाजीरावची पत्नी वर्षा पानमंद, चेअरमनचे बंधू शिवाजी पानमंद आणि शिवाजी नरसाळे यांनी राजीनामे का दिले हेही सभासदांसमोर जाहीरपणे सांगावे. मुळात ही संस्था प्रशासक राजवट आल्यानेच वाचली. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी पाच टक्केच्या प्रमाणात वाटप झाली, त्याचे संपूर्ण श्रेय प्रशासकाचेच आहे. प्रशासक आला नसता तर यांनी मल्टीस्टेट पतसंस्थेप्रमाणेच यांनी विकून टाकली असती.

क्लिप खोटी असेल तर गुन्हा का दाखल करत नाही!
गोरेश्वर पतसंस्थेचा फर्निचर पुरवठादार आणि तत्कालीन व्हाईस चेअरमन यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्यात चेअरमन यांनी कमिशनमधून बंगला बांधून घेतल्याचे बोलणे आहे. ही क्लिप खोटी असेल तर चेअरमन आणि त्याच्या समर्थकांनी क्लीप व्हायरल करणाऱ्यांवर आणि त्या क्लीपमध्ये बोलणाऱ्यांवर गुन्हा दाखल का केला नाही. मात्र, ती क्लिप सत्य असल्याचे आम्ही सिद्ध करायला तयार आहोत. आम्ही जे जनतेसमोर मांडतोय ते सर्व पुराव्यानिशी आहे.

मल्टिस्टेटच्या विक्रीतून आलेले कोट्यवधी रुपये कुठे गेले?
गोरेश्वर मल्टिस्टेट ही पतसंस्था बाजीरावने तरुंगात जाण्याआधी विकली. त्यातून काही कोटी रुपये बाजीरावला मिळाले. विक्रीनंतर त्या संस्थेतील अनेकांना आजही त्यांच्या ठेवीची रक्कम मिळाली नाही. मग, असे असताना ही कोट्यवधीची रक्कम बाजीराने नक्की कोठे ठेवली असा प्रश्न सभासदांना पडला आहे. मुलगा, सुन- बायको यांच्या नावाने पुण्यात कोट्यवधी रुपयांची प्रापट कशी खरेदी झाली हे सभासदांच्या समोर आले आहे. ठेवीदारांचा तळतळाट लागल्यानेच यांना तुरुंगात जावे लागले.

मलिद्यासाठी आणि पुत्रप्रेमात आकंठ बुडालेल्या बाजीरावला ओळखा!
गोरेश्वर महाराजांच्या नावाने सर्वांना अंधारात ठेवून मल्टीस्टेट पतसंस्था काढली. तिच्याशी गावकऱ्यांसह सभासदांचा संबंध ठेवला नाही. ती पतसंस्था ढोपरापर्र्यंत ओघळ येईपर्यंत बाजीरावसह त्याच्या दिवट्या मुलाने ओरबडून खाल्ली! तेथील ठेवीदारांचे आजही कोट्यवधी रुपये अडकले असताना त्याने ही संस्थाच विकली. संस्था विकल्यानंतर त्यातून कोट्यवधी रुपये याच बाजीराव आणि त्याच्या कुटुंबाला मिळाले. तेच पैसे आता गोरेश्वर ग्रामीण पतसंस्था ताब्यात घेण्यासाठी त्याचा मुलगा आणि त्याचे भामटे सहकारी उडवत आहेत. त्यांना सभासदांनी ओळखण्याची गरज आहे.

मलिदा यांनी खाल्ला आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांना ठेवीदारांच्या शिव्या!
गोरेश्वर ग्रामीण पतसंस्थेच्या निवडणुकीत संस्थापक पॅनल आपले घोटाळे दडपण्यासाठी अकांडतांडव करत आहेत. सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. आम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे त्यांनी सभासदांसमोर आजही द्यावीत. सभासदांची दिशाभूल करणे थांबवावे. ठेवीदार वर्षभर चकरा मारत असताना चेअरमन आणि त्याचे स्वकीय घरात दडून बसले आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मात्र ठेवीदारांच्या शिव्या खाल्या. संस्थेतील कर्मचारी हे त्या संस्थेचा कणा असतात. त्यांना विश्वासात घेऊन काम झाले असते तर आज ही अवस्थाच आली नसती. त्यामुळे निवडणूक संपताच सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन, चांगले ठेवीदार शोधून आम्ही ही पतसंस्था नव्याने उभी करणार आहोत. आमच्या मंडळाने अतिशय सुज्ञ आणि उच्चशिक्षित उमेदवार दिले असून एकाही संचालकाचे पोटपाणी या संस्थेच्या मानधनावर, मासिक भत्यावर चालू असल्याचे दिसणार नाही.
– डॉ. राजेश भनगडे, माजी सरपंच, ढवळपुरी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खरे असणारे दीड किलो सोने बनावट कसे झाले?: बाबासाहेब तांबे

गोरेश्वर पतसंस्था बाजीराव पानमंद व कुटुंबाने खासगी प्रॉपट असल्यागत चालवल्यानेच ही संस्था अडचणीत आली! पारनेर...

शिवसेना-मनसे युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; आता थेट…

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे...

27 केंद्रांना कृषी विभागाचा दणका; किती परवाने केले निलंबित?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री खरीप हंगाम 2025 अनुषंगाने कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची व्यापक...

मनपा, झेडपीसाठी शिंदे सेना सज्ज; शनिवारी नगरमध्ये मेळावा

संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे...