Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून त्यांना लुटण्यात आले आणि त्यानंतर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सदरची घटना रविवारी दि. २९ रोजी रात्री घडली. वारकरी गट विश्रांतीसाठी चहासाठी थांबला असताना दोन जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी वारकऱ्यांना धमकावत गळ्याला कोयता लावून लुटले. त्यानंतर या दोघांनी अल्पवयीन मुलीला जवळच्या झुडपांकडे ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या अमानवी घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुका सुन्न झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. वारकरी वारीत सहभागी असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे राज्यातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण बिघडू शकते, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.