सांगली । नगर सहयाद्री:-
मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. शीतल धनपाल पाटील असे मृत युवकाचे नाव आहे.
रविवार ८ सप्टेंबर रोजी रात्री गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना दोन गटांमध्ये वाद झाला. या वादात शीतल पाटील हा शांतता राखण्यासाठी वाद सोडवण्यासाठी पुढे गेला. मात्र, त्याचवेळी काही हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत विकास बंडू घळगे (३५), क्षितिज ऊर्फ आप्पा शशिकांत कांबळे (२८), आणि आदित्य शंकर घळगे (२२, सर्व रा. अंकली) या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
शीतलच्या मृत्यूमुळे अंकली गावात शोककळा पसरली असून, सोमवारी सकाळी पार्थिव गावात आणण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध म्हणून गाव बंद पाळण्यात आला. पोलिसांनी घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.