अहिल्यानगर । नगर सहयाद्री
आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची भूमिका घेत मुस्लिम बांधवांविषयी अपशब्द वापरले. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद उमटले. आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विधानाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली आहे. आमदार जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बोलावणे झाल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात काढलेल्या मोर्चादरम्यान मुस्लिम बांधवांविषयी अपशब्द वापरले. या वक्तव्याबाबत पुण्यात पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मी त्याला बोलावले आहे. आमदारांची मिटींग आहे. त्याला याबाबत विचारणा करणार आहे. ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. आमच्या पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेचीच आहे. सर्वधर्म समभावाची आहे. तो असा का बोलला त्याची माहिती मी घेणार आहे. त्याच्याशी चर्चा करणार आहे.
समज गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्याचे काम करणार आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांची नावे घेतो. त्यांची जी विचार धारा आहे. त्यांच्याच विचारधारेने आपण पुढे जायला हवे असे माझे मत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलात सर्व जाती धर्माचे लोक होते असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.