आप्पा चव्हाण | नगर सह्याद्री:-
काही व्यक्ती जरी या जगातून निघून जात गेल्या तरी त्यांच्या बलिदानाची प्रकाशज्योत कायम तेवत राहते. अशीच एक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. मेंदुमृत झालेल्या युवकाच्या अवयवदानाने अनेक गरजूंना जीवदान मिळणार आहे. वैभव सोपान खैर यांच्या आई-वडिलांनी घेतलेल्या महान निर्णयामुळे त्याचे दोन नेत्र, मूत्रपिंड, यकृत आणि एक हृदय गरजवंत रुग्णांना नवसंजीवनी देणार आहे.
याबाबत माहिती अशी, गरिबीशी झुंज देणाऱ्या एका शेतकरी, कष्टकरी वडिलांनी वैभवला संघर्षातून स्वतःच्या पायावर उभ केल होत. पुण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये वैभव कार्यरत होता. शुक्रवार दि. 7 मार्च रोजी वैभवला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर सहकाऱ्यांनी वैभवला रुग्णालयात दाखल केले. तज्ञ डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्यानंतर ब्रेनडेड झाल्याचे निदान झाले.
याबाबतची माहिती कुटूंबियांना समजल्यानंतर मोठा धक्काच बसला. डॉ. शीबा वाकडे यांनी कुटुंबाला समुपदेशन करून अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले. मेहुणे सचिन अंबेकर, भाऊ हरीचंद्र खैरे, भाऊ कृष्णा दळवी, मामा अनाजी दळवी, मेहुणे दत्तू इल्हे, रूममेट स्वप्नील आणि सर्व कुटुंबियांनी गरजू रूग्णांसाठी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करून त्याचे अवयव गरजू रूग्णांसाठी नोंद असलेल्या ठिकाणी नेण्याचे निश्चित करण्यात आले.
नियतीने दुःखाची शिदोरी पाठवली!
संपूर्ण कुटुंब आनंदात होतं, 9 मार्च रोजी साखरपुडा ठरला होता. कुटुंबाने साखरपुड्याची तयारी केली होती. मात्र उद्याच्या संसाराची स्वप्न रंगवाणारा वैभव खरंच एक मोठं अस्वस्थ करणार दुःख देऊन गेला. नियतीने आनंदाऐवजी दुःखाची शिदोरी पाठवली. मात्र शेतकरी, कष्टकरी वडिलांच्या मुलाने मृत्यूनंतरही समाजासाठी अमूल्य देणगी दिली. वडिलांनी केवळ आपल्या मुलाला अमर केले नाही, तर एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही दिला.
कुटुंबाचा आधार नियतीने हिरावून नेला!
गरिबीशी झुंज देणाऱ्या खैरे कुटूंबात वैभवचा जन्म झाला. वडील सोपान खैरे, आई देऊबाई खैरे, बहिण सुलोचना इळे आणि भाऊ हरीचंद्र खैरे यांनी त्याला शिकवण्यासाठी मोठा संघर्ष केला. पोखरी गाव डोंगराळ भागात आहे, वाहतुकीच्या मर्यादा आहेत, पण या सर्व अडथळ्यांना न जुमानता वैभवने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करत पदवी घेतली. त्याच्या कष्टामुळे कुटुंबाला आधार मिळाला, पण नियतीने तो आधार हिरावून घेतला.