श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुकडीच्या आवर्तनावर मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली होती. परंतु मोठ्या मेहनतीने सांभाळलेल्या फळबागा पाण्याअभावी डोळ्यासमोर जळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मोसंबी, द्राक्ष, डाळींब, केळी, संत्री आदी फळे गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर घेण्यात येतात. पाण्याविना या फळबागा जळाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मशागतीसाठी केलेला खर्च निघाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कुकडीचे पाणी वेळेत न आल्याने अनेक वर्षांपासून फळबागा जपलेल्या जळून चालल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांचा ऊस करपून गेला आहे. तर पाण्याअभावी कलिंगड अर्ध्यावर सोडून द्यावे लागले असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे हाल होत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींकडून काही उपाययोजना केल्या जात नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी दमदार पाऊसच झाला नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरातील ओढे, नाले, तलाव, कोरडे पडले असून पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील काही गावामध्ये ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागत आहे. शेतकऱ्यांना फळबागा जगवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे विदारक चित्र श्रीगोंदा तालुक्यात दिसत आहे.
५ हजार लिटरच्या टॅंकरसाठी ३ हजार
सध्या पाच हजार लिटरच्या लहान टॅंकर साठी २ ते ३ हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे. या पाण्यावर कशी तरी २००-३०० झाडे जगवता येत आहेत. तसेच तीव्र उन्हाळामुळे पाच ते सहा दिवसांनी पुन्हा पाणी द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. फळबागा जगण्यासाठी पाणी विकत घेताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने बागा जगवणे अवघड झाले आहे.
कुकडीचे आवर्तन सोडण्याची मागणी
कशी करावी शेती ,पाणी मिळत नाही, मशागतीचा खर्चही निघत नाही, कुकडीचे आवर्तन वेळेवर सोडत नाहीत, सध्या पाणी नसल्याने फळबागा जळू लागल्या आहेत. फळबागा जगविण्यासाठी २ ते ३ हजार रुपये टँकरला मोजावे लागत आहेत. बागा जगविण्यासाठी शासनाने मदत करावी. कुकडी कॅनल चे आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.