Maharashtra Weather Update राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन काही अंशी विस्कळीत झाले आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर अधिक आहे.
याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे. या भागांत डोंगर उतारांवर भूस्खलनाचा धोका, तर नद्या व नाल्यांच्या आसपास पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर मराठवाडा व विदर्भातील बहुतांश भागांत हलक्याशा स्वरूपाचा पाऊस झाला असून काही जिल्ह्यांत पावसाची नोंद नगण्य आहे. राज्यातील इतर भागांत देखील पुढील दोन दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाची नोंद (मिमीमध्ये)
ठाणे ७३.७, रायगड ५४.१, रत्नागिरी ४७.७, सिंधुदुर्ग १२.७, पालघर ४९.७, नाशिक ७.७, धुळे ७.१, नंदुरबार ४, जळगाव ६.७, अहिल्यानगर १.१, पुणे ११.९, सोलापूर ०.९, सातारा १९.७, सांगली ६, कोल्हापूर १७.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना ०.१, बीड ०.७, लातूर ०.१, धाराशिव १.६, नांदेड ३.६, परभणी १.७, हिंगोली ३.६, बुलढाणा ३.५, अकोला ८.७, वाशिम ८.५, अमरावती ९.४, यवतमाळ ८.७, वर्धा ७.६, नागपूर ०.९, गोंदिया ०.२, चंद्रपूर ११.९ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.