श्रीगोंदा। नगर सहयाद्री
राजकीय विषयांवर बोलताना आमदा रविक्रमसिंह पाचपुते यांनी माजी आमदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीत आणि केवळ प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला, यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षात किती महत्त्व दिले जाते, हे दिसून येते, अशी बोचरी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सध्या तालुक्यातील काही नेते वारंवार पक्षांतर करत असून, पाच महिन्यांत किती पक्ष बदलले गेले, याची जनतेला कल्पना आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला. मात्र, या राजकीय घडामोडींचा भाजप व पाचपुते कुटुंबावर कोणताही परिणाम होणार नसून, उलट आगामी निवडणुकीत भाजप अधिक ताकदीनिशी उतरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्रीगोंदे तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे आणि जनजीवनाचे नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रशासनास सरसकट पंचनामे करण्याचा सूचना दिल्या आहेत. श्रीगोंदे येथील माऊली निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रवीण मुगदुल आणि तालुका कृषी अधिकारी गांगर्डे उपस्थित होते.
आमदार पाचपुते यांनी सांगितले की, मे महिन्यात ३६९ मिमी पावसाची नोंद झाली असून त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मी याबाबत महसूल मंत्री बावनकुळे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली असून, लवकरच नुकसान भरपाई संदर्भात ठोस निर्णय घेतला जाईल.
तालुक्यातील सर्व गावांमध्ये सरसकट पंचनामे करण्याचा सूचना महसूल व कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. अवकाळी पावसामुळे घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू, वाहून जाणे अशा घटनांची नोंद काटेकोरपणे करण्याचेही त्यांनी सुचवले.
तसेच, अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टिक नोंदणी न केल्याचे लक्षात घेत, त्यांनी तत्काळ नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच पुढील लाभ मिळणार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आधीच्या वर्षांतील नुकसानभरपाईबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. २०२१-२२ आणि २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीसाठी लाखो रुपयांचे अनुदान तहसील कार्यालयात पडून असून, ते अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे त्यांनी उघड केले. तहसीलदारांच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, अशी टीका करत, त्यांनी यावर तात्काळ कारवाईची गरज व्यक्त केली.