संगमनेर / नगर सहयाद्री :
काँग्रेसची पीछेहट झालेली नाही तर तत्त्वज्ञानाची पीछेहाट होत आहे. काँग्रेसला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. या पक्षाचे आपण सदस्य आहोत याचा अभिमान प्रत्येकाने बाळाला पाहिजे. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेवरून हटवण्याचा संकल्प करा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
लोणावळ्यातील दोन दिवसाच्या राज्यस्तरीय शिबिरात समारोपाचे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांचेसह काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, आमदार, आजी-माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की.सध्या व्यावसायिक राजकारण झाले आहेत, सत्ता आली की तिकडे जायचे, पुन्हा काँग्रेसची सत्ता आली की पुन्हा काँग्रेसमध्ये यायचे. हे चालणार नाही अशी भूमिका घेतली पाहिजे. सत्तेत जायचे, पैसे कमावायचे असले धंदेवाईक राजकारण चालू देऊ नका. अशांना काँग्रेस पक्षात स्थान देऊ नका. अशा धंदेवाईक राजकारण्यांना जनतने धडा शिकवला पाहिजे. राहुल गांधी यांचे कष्ट वाया जाणार नाहीत, भारत जोडो यात्रेतून सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे. आपणही जनतेकडे गेले पाहिजे, चांगले काम केले तर महाविकास आघाडी लोकसभेच्या ३८ जागांपेक्षा जास्त जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी फार कमी वेळ राहिला आहे. आता निवडणुका सायंटिफिक पद्धतीने लढवल्या पाहिजेत यावर चर्चा झाली आहे. बुथ मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचे आहे. इंडिया आघाडीला सत्तेत आणण्यासाठी काम केले पाहिजे आणि राज्यातून ४८ जागा जिंकण्याचे लक्ष ठेवा. तसेच पक्षात शिस्त असली पाहिजे. कोणी काहीही बोलावे हे चालणार नाही. एनएसयुआय, युवक काँग्रेस, फ्रंटल सेल त्यांच्याही प्रदेश स्तरावर बैठका झाल्या पाहिजेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, पंतप्रधान मोदी सातत्याने भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची असल्याचे सांगत असतात व स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील त्यावेळी २०४७ साली भारत विकसीत राष्ट्र होईल. भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची झालेली आहे परंतु नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेची जी गती राहिली त्याच्या तुलनेत डॉ. मनमोहनसिंह सरकारच्या काळातील गती जास्त होती, त्याच गतीने वाढ झाली असती तर भारत आजच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला असता. युपीए काळात अर्थव्यवस्थेचा विस्तार १८३ टक्के झाला तर मोदी काळात तो १०३ टक्के झाला. अर्थव्यवस्थेची पिछेहाट होण्यामागे नोटबंदी, जीएसटीची अंमलबजावणी, अचानक लावलेला लॉकडाऊन, शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्ध आणि भ्रष्टाचार या पाच मुद्द्यांमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली.
२०४७ साली भारत विकसीत राष्ट्र होणार असे स्वप्न दाखवले जात आहे पण त्यासाठी दरडोई उत्पन वाढले पाहिजे. ज्या देशाचे दरडोई उत्पन्न जास्त ते समृद्ध राष्ट्र. त्यासाठी दरडोई उत्पन्न १३ हजार ८४५ डॉलर असावे लागते. सध्या भारताचे दरडोई उत्पन्न २८०० डॉलर आहे. आणि त्यासाठी १० टक्के दराने अर्थव्यवस्था वाढली पाहिचे पण मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेचा दर ६.०-६.२५ टक्के आहे.म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ अशी मोदींची अवस्था आहे, असे चव्हाण म्हणाले