Rohit Pawar: राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यातील ७५ मंडळांत अतिवृष्टी झाली असून पावसाने ५ जणांचे जीव घेतले आहेत. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाने कहर केला. पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर व बोटींच्या साह्याने स्थलांतरित केले जात आहे.
पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा असणार आहे. तसेच, शुक्रवारनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे, या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे.
त्यांनी याबाबतची पोस्ट त्यांच्या सोशल मिडीयावरती शेअर करत शेतकऱ्यांना मदत करावी असं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, “अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने मायबाप सरकारला सांगायचंय, आज जाती-धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी या सर्वच समाजाचे शेतकरी अडचणीत आहेत. म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून #माणुसकी_धर्माला आणि #महाराष्ट्र_धर्माला जागून शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची नितांत गरज आहे. आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय.
शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे. आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है..! अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत #ओला_दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची घोषणा करा आणि हीच #योग्य_वेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करा, ही आक्रोश करणाऱ्या बळीराजाच्यावतीने कळकळीची विनंती!”, असं म्हटलं आहे.