जामखेड । नगर सहयाद्री
जामखेड पोलिसांनी कर्जत तालुक्यातील रत्नापुर येथील एका शेतातून तब्बल २८ किलो ३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शेतमालक विजय ढवळे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
९ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेडमधील गोरोबा टॉकीजजवळ राहणाऱ्या नितीन उर्फ कव्या धनसिंग पवार (४२) आणि निशा नितीन पवार (३२) यांच्या घरावर छापा टाकून अडीच किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणात शामसुंदर अंकुश जाधव यांनी फिर्याद दिली होती.
दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी रत्नापुर येथील विजय अशोक ढवळे यांच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती दिली. त्यानुसार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोउनि किशोर गावडे, पो.हे.कॉ. तुकाराम सोनवणे, पो.कॉ. ईश्वर माने, पोकों भागीरथ देशमाने व योगेश दळवी यांच्या पथकाने ढवळे यांच्या शेतावर छापा टाकला.
छाप्यात २८ किलो ३० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे आढळून आली आहे. सदर शेतमालक विजय ढवळे सध्या फरार असून त्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.