मुंबई / नगर सह्याद्री –
देशात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार 50 ते 60 किमी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे.
आयएमडीने दिलेल्या इशार्यानुसार पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आसा असून, हवामान विभागानं जारी केलेल्या इशाऱ्यानुसार राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये या काळात जोरदार वारं वाहणार असून, तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. तर झारखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज येलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.