अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अशातच रविवारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे पुन्हा शहर हादरले आहे. या घटनेमुळे पुन्हा कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरातील सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावर जीवे ठार मारण्याचा उद्देशाने गोळीबार केल्याची घटना घडली.
जुन्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी प्रमोद रामदास घोडके ( रा दत्त मंदीराशेजारी, ढवण वस्ती, तपोवन रोड) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार भीमराज आव्हाड, राहुल सांगळे, मयुर फणसे, आकाश नसाणे, कुणाल मराठे (सर्व रा. अहिल्यानगर) यांच्यासह एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद घोडके तपोवन रस्त्यावरील ढवण वस्ती परिसरात कटूंबासह वास्तव्यास आहे. रविवार दिनांक १ जून रोजी भाऊ आनंद उर्फ बबलु ढवण याचा वाढदिवस मित्रासह साजरा केला. त्यानंतर अंदाजे १२.२५ वाजेच्या सुमारास जवळच असलेल्या इंडो आयरीश हॉस्पीटल, तपोवन रोड येथे डोकेदुखीची गोळी आणण्यासाठी गेले.
त्यावेळी राजवाडा हॉटेलच्या बाहेर मयुर फणसे व कुणाल मराठे उभे होते, त्यांनी फिर्यादी प्रमोद घोडके यांना आवाज देवुन बोलावले. तु त्या ऋषी ढवणसोबत का राहतो? तुला किती वेळा सांगितले की, त्या ऋषी ढवणसोबत राहु नको, असे म्हणुन शिवीगाळ करीत त्यांना मारहाण करु लागले. तेवढ्यात हॉटेल राजवाडामधुन आकाश नसाणे बाहेर आला. त्यांनी देखिल मारहान केली.
प्रमोद घोडके कसेबसे त्यांच्या तावडीतून सटकले. त्यानंतर ते जेथे केक कापला तेथे मित्रांजवळ गेले. काहीवेळातच तेथे राहुल सांगळे व भीमराज आव्हाड हे आले. तेव्हा भिमराज आव्हाड याने त्याच्या हातातील पिस्टलने दोनदा जीवे ठार मारण्याचा उद्देशाने गोळीबार केला. परंतु सुदैवाने गोळी कोणालाही लागली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.