अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
कर्नाटक येथून ट्रक मध्ये सुमारे 28 लाख रूपयांचा 42 टन हरभरा भरून तो खाली करण्यासाठी हरीयाणा येथे जात असलेल्या चालकाचा (ड्रायव्हर) धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. अनुपसिंह गोपाळसिंह बालेचा (वय-43 रा. नोखा, जि. बिकानेर, राजस्थान) असे खून झालेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. नगर तालुक्यातील वाळुंज ते नारायणडोह जाणाऱ्या बायपास रस्त्यावर नारायणडोह शिवारात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. दरम्यान, मालट्रक लुटीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. खून करणाऱ्या दोघा संशयितांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
साहेबा आनंदा गायकवाड व उस्वाल इंपिरिअल चव्हाण (दोघे रा. वाळुंज, ता. नगर) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुपसिंह यांनी त्यांच्याकडील ट्रक मध्ये कर्नाटक येथून सुमारे 28 लाख रूपये किमतीचा 42 टन हरभरा भरला होता. तो हरभरा त्यांना हरीयाणा येथे खाली करायचा असल्याने ते अहिल्यानगर मार्गे हरियाणाच्या दिशेने जात होते. दरम्यान, ते मंगळवारी सकाळी नारायणडोह शिवारात आल्यानंतर त्यांना दोघांनी अडविले.
त्यांच्या ताब्यातील 28 लाख रुपयांचा हरभरा व 40 लाख रूपयांचा मालट्रक असा 68 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लुटण्यासाठी दोघांनी अनुपसिंह यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करून त्यांना ट्रकच्या खाली ढकलून दोघे लुटारू ट्रक घेऊन निघाले. दरम्यान, ट्रक घेऊन जात असताना त्यांनी विद्युत वाहक पोलला धडक दिली. ट्रक चालकाचा खून करून ट्रक लुटला जात असल्याचे स्थानिकांच्या लक्ष्यात आले. त्यांनी हा सर्व प्रकार पोलिस अंमलदार गांगर्डे यांना फोन करून सांगितला. माहिती मिळताच नगर तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपतराव भोसले, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार लुटीच्या उद्देशाने केला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.