अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरासह बिले वाटप करण्यात आले आहे. महानगरपालिका अधिनियमानुसार एप्रिल महिन्यात सर्वसाधारण करावर १० टक्के सवलत दिली जाते. मात्र, यंदा ३१ मेपर्यंत सर्वसाधारण करावरील १० टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. शहरातील ३१७२७ मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेऊन कर भरला आहे. सवलतीसाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले असून, नागरिकांनी याचा लाभ घेऊन वेळेत कराचा भरणा करावा व दंड टाळावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या वसुलीला मागील आर्थिक वर्षात नगरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे विक्रमी वसुली झाली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १४० अ नुसार करात एप्रिलमध्ये १०%, मे व जूनमध्ये ८% अशी सर्वसाधारण करात सूट दिली जाते. या वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरानुसार बिले वाटप करण्यासाठी काही प्रमाणात विलंब झाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात दिली जाणारी १०% सवलत अनेकांना मिळू शकली नाही. नवीन दरानुसार बिलांचे वाटप केल्याने काहींना उशिरा बिले मिळाली. त्यामुळे नागरिकांना सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी मे महिन्यातही १० टक्के सवलत सर्वसाधारण करावर देण्यात आली आहे.
चालू आर्थिक वर्षात २७ मे पर्यंत ३१७२७ मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेतला. त्यांना आत्तापर्यंत सुमारे ७० लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे. सवलतीसाठी आता तीन दिवस शिल्लक राहिले असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व ३१ मे अखेरपर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे. दरम्यान, ज्यांना बिले मिळाली नसतील अशा नागरिकांनी त्यांच्या प्रभाग समिती कार्यालयात जाऊन बिल काढून घ्यावे व सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.