वारंवार संधी देऊनही थकबाकी न भरल्याने महानगरपालिकेकडून कठोर कारवाई सुरू / १५ दिवसात संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे ताब्यात घेऊन लिलाव करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
शहरात महानगरपालिकेच्या असलेल्या विविध गाळे व वर्ग खोल्यांची थकबाकी २५ कोटींवर पोहोचली आहे. संधी देऊनही गाळेधारक थकबाकी भरत नसल्याने महानगरपालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे. मध्य शहरातील गंज बाजार येथील गाळेधारक व ओटे धारकांकडे सुमारे तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. या ठिकाणी १४१ गाळे व ओटे असून त्यापैकी ६५ जणांना महानगरपालिकेने जप्तीच्या नोटीसा बजावल्या असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
गंज बाजार भाजी मार्केट व व्यापारी गाळ्यांमध्ये १४२ गाळेधारक व ओटे धारक आहेत. त्यातील एका गाळ्याची हस्तांतरण प्रक्रिया झालेली आहे. उर्वरित १४१ गाळे धारकांचे करारही संपुष्टात आलेले आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस महानगरपालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे गाळेधारकांनी पैसे जमा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र अद्यापही येथील गाळेधारकांकडे तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. महानगरपालिकेने एप्रिल व मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्व माहिती संकलित करण्यात आली आहे. गाळेधारक वारंवार संधी देऊनही थकबाकी भरत नसल्याने सदर गाळे ताब्यात घेण्याबाबत कारवाई सुरू केली आहे. कारवाई झाल्यानंतर हे गाळे पुन्हा लिलाव करून दिले जाणार आहेत.
१४१ गाळेधारकांपैकी सुमारे ८० ओटे धारक आहेत. तसेच इतर गाळेधारक आहेत. यातील ६५ जणांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ८१ ब नुसार जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांच्या आत थकबाकीदारांनी संपूर्ण थकबाकी न भरल्यास त्यांच्यावर जप्ती कारवाई करून ओटे व गाळे ताब्यात घेण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे. महानगरपालिकेने वारंवार थकबाकी भरण्याची संधी दिलेली आहे. तरीही प्रतिसाद मिळत नसल्याने महानगरपालिकेकडे कारवाई शिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व राज्य शासनाच्या निर्देशानुसार भाडे आकारणी केली जात आहे. नवीन करारनामे व भाडे आकारणी नियमानुसारच केली जाणार आहे, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.